भारतीय ‘शास्त्रीय’ परंपरेची ओळख

अंधश्रद्धा, जातीपाती, रुढी-परंपरा यात गुरफटलेला, कोणती नवी माहिती सांगितली, की ‘आपल्या पूर्वजांना (रामायण-महाभारत काळात) ही माहिती होतीच, जगाला आता समजली,’ अशा बढाया मारणारा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनापासून पूर्णपणे फारकत घेतलेला समाज, अशीच भारतीय समाजाची, संस्कृतीची ओळख आजच्या नव्या पिढीला झाली आहे. ही ओळख खरी आहे का? अनेकदा ज्या परंपरांचा अभिमानाने आपण उल्लेख करतो त्या परंपरा आपल्याला पूर्णपणे माहीत असतात का? का केवळ भावनिक मुद्‌द्‌यांवर आपण भारताचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचा प्रयत्न करतो? खरा इतिहास नव्या पिढीसमोर योग्य पद्धतीनं मांडला नाही, तर त्याची ओळखच होणार नाही. शास्त्रीय दृष्टिकोन भारतानं कधी जोपासलाच नाही, असा एक आक्षेप नेहमी घेतला जातो. हा आक्षेप काही खरा नाही. प्राचीन काळात आपल्याकडं विविध प्रकारची शास्त्रं निर्माण झाली, विकसित झाली, आपल्याकडून जगभरात पोचली. परंतु, नंतरच्या हजार-बाराशे वर्षांच्या सततच्या परकी आक्रमणामुळं वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास सुटली. भारतीय वैज्ञानिक प्रगतीचे साक्षीदार असलेले ‘मोती’ विखुरले गेले. हे मोती गोळा करून त्यांची माळ करण्याचे प्रयत्न गेल्या सुमारे शंभरवर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहेत. आता त्यालाही शास्त्रीय अधिष्ठान मिळायला सुरवात झाली आहे.


भारताचा वैज्ञानिक प्रगतीत वाटा काय, या प्रश्‍नाची अनेक उत्तरं मिळतील. अलीकडच्या काही शतकात फारसं काही भारतात घडलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, त्याआधीच्या कित्येक शतकांपासून भारतानं जगाला विज्ञानाचा मार्ग दाखवला आहे. विज्ञान आणि गणित या क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेकांची नावं आपल्याला सांगता येतील. रामायण- महाभारतात अनेक गोष्टी आहेत. त्यातून त्यावेळच्या समाजाची माहिती मिळते. त्यात उल्लेखलेल्या अनेक शस्त्र, अस्त्रांचा उल्लेख वाचला, की ते खरोखच अस्तित्वात होतं, असं वाटायला लागतं. परंतु, त्या केवळ ‘वैज्ञानिक कल्पना’ होत्या, असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. त्या गोष्टी आपल्याकडं होत्या, याचा कोणताही शास्त्रशुद्ध पुरावा नाही. डॉ. जयंत नारळीकर यांनी याचं सुंदर विवेचन केलं आहे. असं असलं, तरी अतिप्राचीन काळापासून भारतात वैज्ञानिक वारसा होता. विशेषत- गणित, खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्राची प्रगती झाली आणि ही शास्त्रं आपल्याकडून जगभरात गेली, याचे पुरावे आहेत. प्राचीन भारतात वेद रचले गेले, वेद समजून घेण्यासाठी शिक्षा, छंद, व्याकरण, निरुक्त (व्युत्पत्तीशास्त्र), ज्योतिष (आजचं खगोलशास्त्र) आणि कल्प अशी सहा वेदांगं रचली गेली. अनेक ज्ञानशाखांचा उगम या वेदांगातून झाल्याचं दिसून येते. ज्योतिष आणि कल्प या वेदांगांमुळं भारतात गणिताची भरभराट झाली. प्राचीन काळात वेगवेगळ्या आकाराच्या यज्ञवेदी तयार करण्यासाठी, त्यांचा आकार ठरविण्यासाठी भूमितीचा पाया घातला गेला. वेगवेगळ्या मोजमापांसाठी वेगवेगळी गणितं तयार केली गेली. ‘पाय’ची किंमत, वर्तुळाचं क्षेत्रफळ, आयताच्या कर्णाचा वर्ग हा त्याच्या दोन संलग्न बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो (आता आपण याला पायथॅगोरस सिद्धांत म्हणतो) अशा प्रकारची अनेक माहिती प्राचीन ऋषींना होती. त्यांनी तयार केलेली सूत्रे मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली, नंतर लिहिण्याच्या साधनांचा शोध लागल्यानंतर कधीतरी लिहिली गेली. संख्यांच्या बाबतीतही हेच आहे. पूर्णांक, अपूर्णांक, करणी संख्या (सर्ड), संभाव्यशास्त्र (प्रोबॅबिलिटी) यांचा अभ्यास भारतीयांनी केला होता. प्रत्येक वस्तू ही अणू-रेणूंनी बनली असते, हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला तो कणादांनी मात्र खऱ्या अर्थाने तो सिद्ध केला आइनस्टाइन यांनी.

भारताच्या या शास्त्रीय परंपरेचा आढावा आणि काही निवडक भारतीयांच्या कामाचा आढावा अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी ‘भारतीय जीनियस’ या तीन पुस्तकांच्या मालिकेतून मांडला आहे. ‘जीनियस’ मालिकेतील पहिल्या १२ पुस्तकांचं प्रकाशन दोन वर्षांपूर्वी झाले. त्यात सर्व विदेशी शास्त्रज्ञांची ओळख करून देण्यात आली होती. आता त्याच्या पुढची ‘भारतीय जीनियस’ ही मालिका प्रकाशित करण्यात आली आहे. यात आर्यभट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, वहारमिहीर, माधवा, विश्‍वेश्‍वरैया, रामानुजन, डी. डी. कोसंबी, सी. व्ही. रामन, मेघनाद साहा, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, जयंत नारळीकर, जगदीशचंद्र बोस, होमी भाभा, लॉरी बेकर आणि एम. स्वामीनाथन यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. या प्रत्येकाच्या संशोधनाचा विषय वेगळा; पण यांना बांधणारा भारतीयत्वाचा धागा एकच. भारताची वैज्ञानिक परंपरा पुढे नेणारे हे खरे शिलेदार! या सगळ्यांची काळाच्या पुढची दृष्टी पाहून थक्क व्हायला होतं. अवघ्या ३३ वर्षांचं आयुष्य लाभलेला, ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ अशा शब्दांत गौरवला गेलेला आणि त्यानं केलेल्या कामावर अजूनही शेकडो विद्यार्थी पीएचडी करतात, असा रामानुजन एकमेवाद्वितीयच. गणित, स्टॅटिस्टिक्‍स, इंडॉलॉजी, नाणकशास्त्र, इतिहास अशा अनेक क्षेत्रात लीलया संचारणारा, संशोधनात अखंड बुडालेला शास्त्रज्ञ अशी दामोदर ऊर्फ डी. डी. कोसंबींची ओळख. प्रामुख्यानं पुण्या-मुंबईत राहून त्यांनी जागतिक पातळीवरचं संशोधन केलं. विश्‍वेश्‍वरैया यांच्याबद्दल सांगण्यासाठी एखादा ग्रंथही अपुरा पडेल. ‘कुठल्याही देवळात जाऊन नमस्कार करणं मला आवडत नाही. माणसाची सेवा हाच माझा धर्म आणि काम म्हणजेच परमेश्‍वर व काम म्हणजेच माझी देवपूजा’ हे सूत्र शंभर वर्षं उराशी बाळगून अखंड कार्यरत असलेल्या भारतरत्न मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैय्या यांची माहिती वाचून ऊर अभिमानानं भरून येतो. ‘आधुनिक भारताचे विश्‍वकर्मा’ अशा सार्थ शब्दांत त्यांचा गौरव केला जातो. महाराष्ट्रातल्या धुळे, नगर, अक्कलकोट, सांगली, पंढरपूर, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नागपूर या शहरांचा पाणी-प्रश्‍न त्यांनी सोडवला. खडकवासला, भाटघर आणि राधानगरी या धरणांवर स्वयंचलित दरवाजे बसवण्याचं आणि या धरणांच्या मजबुतीकरणाचं श्रेय विश्‍वेश्‍वरैय्या यांनाच आहे. नीरा, मुठा, प्रवरा नद्यांवर ब्लॉक पद्धती उभारण्याचं काम त्यांचंच. ही केवळ त्यांच्या कामाची एक झलक आहे. म्हैसूर विद्यापीठासह देशभरात अनेक शैक्षणिक संस्था, शाळा, धरणं, शहरांचा पाणी प्रश्‍न सोडवणं अशी अनेक कामं त्यांनी केली. पुण्यात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या विश्‍वेश्‍वरैय्या यांना सामाजिक कार्याची प्रेरणाही पुण्यात मिळाली ती टिळक, आगरकर, गोखले, महर्षी कर्वे यांच्याकडून. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख ‘भारतीय जीनियस’मध्ये योग्य पद्धतीनं मांडला आहे.

‘रामन इफेक्‍ट’मुळं संपूर्ण जगाच्या चिरस्मरणात राहिलेल्या सी. व्ही. रामन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे लेखकांनी चांगल्या पद्धतीनं मांडले आहेत. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर हे रामन यांचे पुतणे. दोघांनीही नोबेल पुरस्कार मिळविला. दोघांच्या स्वभावांतही जमीन-आस्मानाचा फरक. पण दोघंही असामान्य बुद्धिमान, संशोधनाची तीव्र तळमळही सारखीच. ‘चंद्रशेखर लिमिट’च्या संशोधनाला नोबेल पुरस्कार मिळाला; पण जरा उशिरानंच. ‘स्टेडी स्टेट’वरच्या संशोधनानं जगप्रसिद्ध झालेल्या जयंत नारळीकर यांची माहिती वेगळ्या पद्धतीनं मांडली आहे. त्यांच्यातल्या खगोल संशोधकाबरोबरच सर्वांपर्यंत विज्ञान नेणारा प्रचारक हे रूप अतिशय चांगल्या पद्धतीनं पुस्तकात मांडलं आहे. डॉ. नारळीकर यांच्या संशोधनाची सोप्या भाषेतली मांडणी सर्वसामान्य वाचाकाला कळेल अशीच आहे. त्यांनीच उभ्या केलेल्या ‘आयुका’द्वारे त्यांचं काम पुढं नेलं जात आहे.

वनस्पतींना भावना असतात, असं सिद्ध करणारे कविमनाचे जगदीशचंद्र बोस हे विज्ञानकथा लेखकही होते. ‘भारतीय विज्ञानकथेचा जनक’ असं त्यांना म्हटलं जातं. रविंद्रनाथ टागोर हे त्यांच्या लिखाणाचे चाहते होते. भाराताला अणुशक्तीचा मार्ग दाखवणारे डॉ. भाभा, हरितक्रांतीचे उद्‌गाते डॉ. स्वामिनाथन, ‘साहा समीकरणां’मुळं खगोलशास्त्राला वेगळी दिशा देणारे मेघनाद साहा, जन्मानं ब्रिटीश असूनही भारताला कर्मभूमी मानणारे लॉरी बेकर यांची माहिती सर्वांनी वाचावी अशी आहे. विज्ञानाचे विद्यार्थी नसलेल्यांनाही समजेल अशी पुस्तकाची भाषा आहे. या सर्वांचं कर्तृत्व वाचून आपला ऊर अभिमानानं भरून येईल हे मात्र नक्की!

पुस्तकाचं नाव - भारतीय जीनियस (एकूण तीन भाग)
लेखक - अच्युत गोडबोले, दीपा देशमुख
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन (०२०-६५२६२९५०)
पृष्ठं - १४८, १४८, १५२ / मूल्य - ९९ रुपये (प्रत्येकी)

साधेपणा आणि कुतूहल जपणारी अभिनेत्री

सकाळी साडेसातला अभिनेत्री रीमा लागू गेल्याची 'व्हॉट्‌सऍप'वर बातमी आली, तेव्हा मला तर कोणी तरी ती चेष्टाच केलीय असं वाटलं. अलीकडे अशा अनेकांबद्दलच्या अफवा ऐकल्यानं मी ते गंभीरपणे घेतलंच नाही. उलट अशा अफवांपासून सावध राहण्याची सूचना करण्यासाठी मी रीमालाच फोन लावला. पण तो कोणी उचलेना. मग टीव्ही लावला. तेव्हा धस्स झालं. तातडीनं तिच्या घरी गेलो आणि तिचं पार्थिव बघून तोंडातून शब्दच फुटेना. तिच्या चेहऱ्यावर तोच ताजेपणा होता. मन विषण्ण झालं आणि अनेक दशकं मागे गेलं.
ते 1988 साल असावं. शास्त्रीय संगीताशी संबंधित लेखनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी अशोक जैन यांच्या घरी बसलो होते. तिथे रीमा आली होती. योगायोगानेच ओळख झाली; पण पहिल्याच भेटीत तिचा साधेपणा, जिज्ञासा यांची मनावर छाप पडली. मग कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भेटत राहिलो.


मी, सुहास आणि रवी मालदे मिळून ऑटिस्टिक मुलांसाठी 'आशियाना' नावाची एक शाळा सुरू केली होती. तिथल्या एका कार्यक्रमासाठी रीमा आणि अभिनेता अतुल कुलकर्णी हे दोघेही आले होते. मग दोघंही आमच्या घरी आले. त्या वेळी मला आणि शोभाला तिच्यातला साधेपणा खूपच भावला. त्या वेळी मी फारसं काही मराठीतून लेखन केलेलं नव्हतं. जे काही लिहिलं होतं ते इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजीविषयी होतं आणि तेही इंग्रजीतून. पण त्याविषयी तिने जे कुतूहल व्यक्त केलं, तो मला कौतुकास्पद वाटलं. नवं शिकण्याची, जाणून घेण्याची ही जिद्द हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता.

अनंत सामंत यांच्याकडे मी, विश्‍वास पाटील असे काही जण काही वेळा एकत्र जमायचो आणि गप्पा रंगायच्या. अनंत सामंत आणि विश्‍वास पाटील हे दोघं प्रसिद्ध लेखक. मला आधी वाटायचं यात रीमा कशी काय? पण नंतर जसजसं तिचं बोलणं ऐकत गेलो, तसतसा मी थक्क होत गेलो. तिच्या बोलण्यात वाचलेल्या अनेक गोष्टी सहजपणे येत. तिला मराठी साहित्याविषयी इत्थंभूत आणि सखोल माहिती असायची. पु.ल., जी.ए., गौरी देशपांडे, खानोलकर, विंदा करंदीकर, सानिया अशा अनेकांची बरीचशी पुस्तकं तिनं वाचलेली असायची. मी नुकताच बंगळूरला सानियाला भेटून आलो होतो. एक दिवस सानियाची दूरदर्शनवर मुलाखत चाललेली
होती. ती संपल्यावर रीमाचा मला फोन आला. 'माझी सानियाशी ओळख करून देशील का रे?' साहित्यिकांविषयीचा आदर तर त्यातून व्यक्त होत होताच; पण त्यातले कुतूहलही जाणवत होते. मला तिच्या या स्वभाववैशिष्ट्यांची फार गंमत वाटली.
स्वत: एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही साहित्याच्या क्षेत्रावर प्रेम करणारी डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर अशी जी काही मोजकी नावं मी पाहिली आहेत, त्यात रीमाही होती. तिचं वाचन दांडगं होतं. एका संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिची मुलाखत घेताना मी तिला तिच्या वाचनाविषयी प्रश्‍न विचारले आणि त्याविषयी तीही भरभरून बोलली.

एकदा का प्रसिद्धीचे वलय लाभले की अशा सेलिब्रिटींमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये अंतर पडत जातं. रीमाने स्वतःचे तसे कधीही होऊ दिले नाही. रुपेरी पडद्यावर झळकत असतानाही आपण खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहोत, याचा तिला गर्व नसायचा. ती खूपच 'डाऊन टू अर्थ' असायची. ती स्वयंपाकही उत्तम करायची. माझ्या 'किमयागार' या पुस्तकाच्या प्रकाशनाचे संपूर्ण आयोजन तिनेच केले. अगदी या पुस्तकाचे शीर्षकही तिनेच सुचविलं होतं. हॉलचं बुकिंग करण्यापासून अनेकांना आग्रहाचं आमंत्रण देण्यापर्यंत संयोजनात 'सबकुछ रीमाच' होती. लेखक म्हणून माझी ओळख निर्माण करणारं हे पुस्तक असल्यानं रीमाचं स्थान माझ्या मनात मोठं होतं.

एकदा रीमा न्यूयॉर्कला शूटिंगसाठी गेली होती. मीही ऍटलांटावरून न्यूयॉर्कला येणार होतो. मॅनहटनला 2-3 तास आम्ही तिथे मनसोक्त भटकलो आणि एका
मॅकडोनाल्डमध्ये रात्री दोन वाजता कॉफीही प्यायलो. खूपच मजा आली होती. असं किती सांगावं? आज ती आपल्यात नाही यावर विश्‍वासच बसत नाही. 'पुरुष'सारखी अनेक नाटकं आणि 'वास्तव'सारखे अनेक चित्रपट यांच्यातला तिचा अभिनय मला आवडायचा. याचं कारण पूर्वीच्या गरिबीनं पिचलेल्या, सतत दु:खी अशा दुर्गा खोटे, निरुपा रॉय यांनी रंगवलेल्या आईची प्रतिमा रीमानं पूर्णपणे बदलून ती प्रसन्न करून सोडली होती. एक व्यक्ती म्हणूनही ती मला खूप जवळची वाटायची. पाणी फाउंडेशनच्या कामात सहभागी होऊन आपली समाजाप्रती असलेली जाणीव ती व्यक्त करत होती. त्याचा अजिबात गवगवा न करता गेल्या काही वर्षांत मात्र आमचा संपर्क तुटला होता. क्वचित तिच्यात मला नैराश्‍यही दिसायचं. आत काहीतरी जळत होतं हे सतत जाणवायचं. पण आता हेच नैराश्‍य आमच्यात मागे ठेवून ती मात्र खूप दूर निघून गेली हे कसं समजावून सांगायचं स्वत:ला?

पुस्तकच साथीदार...

पुस्तके माणसाचं जगणं समृद्ध करतात, हे वाक्‍य आपण नेहमी ऐकतो; पण नेमके काय वाचले पाहिजे, हे आपल्या लक्षातच येत नाही. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘मी सध्या हे वाचत आहे’ अशी माहिती मागविणारे आवाहन ‘सकाळ’ने केले आणि वाचकांनी पुस्तकांच्या माहितीचा अक्षरशः खजिनाच उलगडला. अनेक प्रसंगात पुस्तके त्यांना प्रामाणिक साथीदारासारखे साथ देत आली. रोजच्या धकाधकीच्या वाटचालीत पुस्तकांसमवेत घालविलेले क्षण या वाचकांनी सर्वांसाठी शेअर केले. त्यापैकी काही निवडक पुस्तकांची माहिती...


धैर्य, जिद्द आणि शौर्याची रोचक कहाणी

प्रा. अशोक देसाई (पाटण) - लखनौ रेल्वे स्थानकावरून ११ एप्रिल २०११ च्या रात्री ११ वाजता अरूणिमा सिन्हा दिल्लीला मुलाखतीसाठी निघाली. रात्री बारा वाजता तिच्या गळ्यातील सोन्याची चेन चार चोरटे खेचत होते. तिनं त्यांना प्रतिकार केला म्हणून रेल्वेतून बाहेर फेकून दिले. रेल्वेट्रॅकवर पडली, कमरेला दुखापत झाली, उजवा पाय फ्रॅक्‍चर झाला, तेवढ्यात रेल्वे निघून गेली. त्यामुळे डावा पाय गुडघ्यातून तुटून पडला. रात्रभर अशाच अवस्थेत होती. या भयानक प्रसंगाने तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला. दिल्लीत उपचार घेताना एव्हरेस्ट शिखर सर करण्याची इच्छा निर्माण झाली. दुर्दम्य इच्छाशक्ती, अपार कष्ट, कठोर मेहनत, शारीरिक आणि मानसिक बळ, जिद्द यांच्या जोरावर २१ मे २०१३ रोजी अरूणिमा सिन्हाने एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले. कमरेचं दुखणं, एका पायात रॉड आणि एक पाय गमावून एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला म्हणून अरूणिमा सिन्हा ठरली. भारत सरकारने तिला पद्मश्री देवून गौरविले. सध्या उन्नाव येथे चंद्रशेखर क्रीडा प्रबोधिनी स्थापन करून अपंग युवक, युवतींना आत्मसन्मान मिळवून देण्याचे कार्य करते. तिच्या या कामगिरीची कहाणी "बॉर्न अगेन ऑन दी माउंटेन' या पुस्तकात वाचायला मिळते. या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अंधारात चाचपडणाऱ्या, नैराश्‍याने घर केलेल्या, नाउमेद व अपयशी ठरलेल्यांसाठी प्रभाकर करंदीकर यांनी "फिरूनी नवी जन्मले मी' हा अनुवाद केला आहे. हे रोमांचकारी, प्रेरणादायी मराठी पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं.

वजन कमी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी

सौ. मनीषा विनोद मगर, सातारा - सध्या मी वाचत आहे, एक अतिशय सुंदर आणि प्रत्येकाला आवश्‍यक असे ऋतुजा दिवेकर यांचे ‘डोन्ट लूज यूवर माइंड, लूज यूवर वेट’ हे पुस्तक. मला वजन कमी करण्यासाठी एका गाइडची गरज वाटत होती आणि तोही पुस्तकाच्या रूपातच पाहिजे होता. कारण त्याला कितीही पिडले, कितीही प्रश्‍न विचारले तरी तो कधीच वैतागून जात नाही. आपल्या वेळेनुसार आपल्यासाठी उपलब्ध असतो. दिवेकर या अभिनेत्री करिनाची आहारतज्ज्ञ. अतिशय सहजसोप्या भाषेत योग्य मार्गदर्शन त्यांनी केले आहे. खरं तर पुस्तकाच्या नावातच खूप काही आहे. ‘डोन्ट लूज यूवर माइंड’ म्हणजे निराश होऊ नका. फक्त वजन कमी करा, तेही योग्य पद्धतीने. खूप ठिकाणी वेगळी उदाहरणे देऊन ते सांगितले आहे. काय खावे आणि महत्त्वाचे ते कसं खावे म्हणजे वेळ आणि पद्धती कशी असावी. अगदी हसत खेळत आपल्याला आपल्या चुकापण दाखविल्या आहेत. स्थानिक पदार्थांचे महत्त्व पटवून दिले आहे. आवडते पदार्थ कसे खावे आणि तरीही वजन कसं कमी करायचं ते अतिशय सुंदर आणि योग्य मार्गदर्शन पुस्तकात आहे. मला फार आवडले हे पुस्तक. वजन कमी करायला अगदी कमी पैशात मिळालेला मार्गदर्शक म्हणजे हे पुस्तक.

देशप्रेमी सेनानीचा प्रेरणादायी प्रवास

सौ. अर्चना सुहास आमणे (कऱ्हाड) - एक मराठी व्यक्ती ग्रुप कॅप्टन (निवृत्त) दिलीप परुळकर १९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकच्या तावडीत युद्धकैदी म्हणून सापडले. तेथून त्यांनी आपल्या दोन मित्रांसह कशी सुटका करून घेतली, याचे चित्तथरारक वर्णन डॉ. मीना शेटे- संभू यांच्या "वीरभरारी' पुस्तकात आहे. त्यातून त्यांचे धाडस, शौर्य, देशप्रेम, तडफदारपणा, पकडले गेल्यानंतरही न घाबरता निर्णय घेण्याची स्थिर चित्तवृत्ती दिसून येते. हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू एका धाडसी, देशप्रेमी सेनानीचा प्रेरणादायी प्रवास मांडणे आणि तरुणांनी हवाई दलाकडे वळावे हा आहे. पुस्तक वाचायला सुरवात केल्यानंतर ते वाचून झाल्यावरच आपण खाली ठेवतो, इतके ते वाचनीय, स्फूर्तिदायक आहे.

तालिबानचा उदय अन्‌ होरपळणारी माणसं!

सौ. स्मिता राजेंद्र साळुंखे (सातारा) - मी सध्या खालिद हुसैनी लिखित "द काइट रनर' या पुस्तकाचे मराठी भाषांतर वाचत आहे. या पुस्तकाला त्यांच्या "थाउजंड स्प्लेंडिड सन्स' या पुस्तकाप्रमाणे अफगाणिस्तानची पार्श्वभूमी आहे. साठीच्या दशकापर्यंत शांत असलेलं अफगाणिस्तान सत्तराव्या दशकात सत्तापालटाने ढवळून निघते. त्यानंतर आलेल्या अफगाणिस्तान फौजा, त्यांना हुसकावून लावण्यासाठी झालेला तालिबानचा उदय, नंतर झालेला अमेरिकेचा हस्तक्षेप आणि या सर्वांत होरपळून निघणारी तेथील माणसं, ज्यांचं त्यांच्या मातृभूमीवर विलक्षण प्रेम आहे! या पुस्तकातील नायक एक लहान मुलगा आहे. जो आपल्या वडिलांच्या मनात स्वत:चं स्थान बनविण्यासाठी धडपडतोय. रशियन फौजांच्या आगमनामुळे झालेल्या धुमश्‍चक्रीत या मुलाच्या कुटुंबाला अमेरिकेत परागंदा व्हावं लागतं ! पुस्तकाच्या मलपृष्ठावरील सारांशावरून कळते की, कित्येक वर्षांनंतरही त्याला मातृभूमीला परतायचंय, त्याच्या हातून घडलेल्या अक्षम्य गुन्ह्याचं प्रायश्‍चित्त घेण्यासाठी!

मानवी जीवनाचे वास्तव

सौ. रंजना सानप (मायणी) - मी सध्या रॉबिन शर्मा यांचे ‘संन्याशी, ज्याने आपली संपत्ती विकली’ हे पुस्तक वाचत आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे रॉबिन शर्मा यांनी मानवी जीवनाचे वास्तव या पुस्तकातून मांडले आहे. या पुस्तक वाचनाने मी अनेक समस्येवर मात करत आयुष्याची नव्याने सुरवात केली.

सुरेश भट आणि...

प्रकाश देवकुळे (सातारा) - मी सध्या वाचत असलेले पुस्तक आहे ‘सुरेश भट आणि...’ कवी प्रदीप निफाडकर यांनी लिहिलेले हे पुस्तक भटांविषयीच्या स्मरणरंजनाने भरभरून असे आहे. भटभक्तांना माहीत नसलेल्या अनेक घटना, कागदपत्रे, प्रकाशचित्रे आणि त्या प्रवासात आलेल्या अनेक व्यक्ती. त्यांची परस्परांशी असलेली नाती यांचा सविस्तर माहितीपट पुस्तकात रेखाटलाय. भटांचा ‘एल्गार’ ‘झंझावाताच्या’ रूपाने एक वेगळाच रंग आणि नवी ओळख करून देण्यात आली आहे. भटांबद्दलचे वाद, प्रवादांवरही योग्य ते खुलासे केले आहेत. ‘गझल’च्या संदर्भात बरीचशी तांत्रिक माहिती या पुस्तकात मिळते.

मनाचं गूढ - अर्थात मनात
वासंती जाधव (सातारा) - अदृश्‍य असणारी पण आपल्याला सतत साथ देणारी अशी जर कुठली एकमेव गूढ गोष्ट असेल तर ती म्हणजे आपलं मन. एकविसाव्या शतकातही मन आणि शरीर याचं गूढ नात पूर्णपणे उलगडलेलं नाही. डॉ. अच्युत गोडबोले लिखित ‘मनात’ हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफरच म्हणावी लागेल. लेखकाने मनाचं मूळ, त्यातून उद्‌भवलेले आजार आणि मनाचा शोध घेण्याची प्रक्रिया किती पुरातन काळापासून आहे आणि वर्तमानातही त्याचं सुरू असणारं संशोधन हे आणि असे अनेक मनाचे पैलू मांडले आहेत. लेखकाचा अडीच वर्षांचा मुलगा निहार हा ऑटिझम या आजाराने त्रस्त आहे हे समजल्यावर लेखक आणि त्याची पत्नी यांच्यावर झालेला मानसिक आघात आणि त्यातूनच मनाच गूढ उलगडण्याचा एक उत्कृष्ट प्रयत्न म्हणजे ‘मनात’ हे पुस्तक. एखाद्या गोष्टीसारखं लेखकाने हे पुस्तक लिहलं आहे.       

आपण, आपले तणाव

स्वाती भंडारे (कऱ्हाड) - मी सध्या ‘आपण आपले ताणतणाव’ - एक चिंतन, हे अंजनी नरवणे यांचे पुस्तक वाचत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव असतात; पण त्यावर मात करून तणावमुक्त जीवन कसे जगता येईल हे लेखिकेने समर्पक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी काही सहजसोपे उपाय सुचविले आहेत की जे आपण दैनंदिन जीवनात वापरू शकतो. दिवसाकाठी केव्हाही शांत बसावं. निश्‍चितपणे बरं वाटतं. तरतरी येते. पुस्तकात सांगितलेले हे सर्व उपाय मला पटले. तुम्ही हे पुस्तक वाचले तर तुम्हालाही पटतील.   

मी सध्या हे वाचतोय
दिसा माजी काही तरी वाचावे
अ. अ. वैद्य (सातारा) - वाचन संस्कृती वाढली पाहिजे म्हणून तर संत रामदास स्वामी यांनी ‘दिसा माजी काही तरी वाचावे, लिहावे,’ लिहून ठेवले. सरकारने पुस्तके वाचण्यासाठी शहर खेड्यांत ग्रंथालये काढली. मी अनेक ग्रंथ वाचले. मी वाचलेले वि. वि. बोकील यांची कथा. उंदीरमामा तो काय? पण त्याला पकडण्यासाही सहकुटुंब मागे लागतात. हातात काठी घेऊन, तरी तो सापडत नाही. एकाने तो कोपरा, दुसऱ्याने तो कोपरा असे करत. घरात मात्र काठीने मारताना आरसा फुटला, कपाट बाजूला घेताना कपाटाखाली पाय गेला. सगळ्या घरभर ओरडा; पण मामा काही सापडत नाही. या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे वाचताना हसू आल्याशिवाय राहात नाही. त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील कथा वाचताना मजा येते. कंटाळा येत नाही.

दासबोध
नारायण रामदास मुळे (सातारा) - मी सध्या समर्थ रामदास स्वामींचा दासबोध वाचत आहे. त्यातील विसाव्या दशकातील दहाव्या समासाचे वाचन सुरू आहे. वीस दशक दोनसें समास। साधके पाहावे सावकाश।। विविरता विशेषा विशेष । कळो लागे ।।२०ः१०ः३२।। ही बत्तीसावी ओवी वाचन, श्रवण, मनन व निजध्यास याद्वारे अध्यात्म कसे आत्मसात होईल, याचे मार्गदर्शन करते. या ग्रंथात पहिले ते हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।। तिसरे ते सावधपण। सर्वाविषयी।। अर्थात व्यवहारज्ञानही. हे ज्ञान ‘नेटका प्रपंच’ करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे. ‘‘जो जो जयाचा व्यापार। तथे असावे खबरदार।। हे सांगताना जीवनात सचोटीच्या व्यापारीवृत्तीने नफा मिळवावा व स्वतःच्या विकासाबरोबरच ‘लोकांनाही सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करावा, असे बिंबविले आहे. ‘लेकुरे उदंड जाहली। तो ते लक्ष्मी निघोनी गेली।। ही ओवी कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून देते. स्वतः प्रपंच न केलेल्या समर्थांनी ‘प्रपंच व परमार्थ या दोघेमध्ये प्रगती साधणे, हाच खरा पुरुषार्थ, हे सिद्ध करून लोकांना विषद केले आहे. ‘जो उत्तम गुणे शोभला। तोचि पुरुष महाभला।। हे स्वानुभवाद्वारे स्पष्ट करून सांगितले आहे. विवेकाने वागून जीवन सफल केल्यास यशकीर्तीप्रतापी म्हणून समाजात त्यांची नोंद होते. हे दासबोधातून आत्मसात करण्यासारखे आहे.

श्री भक्ती विजय ग्रंथ
नीलम भिसे (सातारा) - मी व माझ्या जाऊबाई सध्या ‘श्री भक्तीविजय ग्रंथ’ वाचत आहे. आमच्या श्री दत्तगुरूंच्या देवळात हा ग्रंथ मिळाला. श्री. महिपाल हे लेखक आहेत. खूप संतांच्या कथा यामध्ये आहेत. श्री ज्ञानेश्‍वर, श्री तुकाराम, श्री कबीर, भानुदास, मुक्ताबाई, जयदेव स्वामी अशा अनेक संतांचा महिमा आहे. ग्रंथ खूप पुरातन आहे. पाने एकदम जीर्ण झाली आहेत; पण वाचनाची गोडी लागली आहे. पूर्वीचे प्राकृत शब्द व अर्थ मी डायरीमध्ये माझ्या शब्दात लिहून काढते. माझ्या मुलालासुद्धा कथा ऐकण्याची गोडी लागली आहे. तो आता या सर्व कथा स्वतः पुन्हा मला सांगतो, हा मोठा फायदा झाला आहे.

छावा
प्रा. जगदीश संपतराव जगताप (वडगाव हवेली, कऱ्हाड) - सध्या शिवाजी सावंतांच्या ‘छावा’ या कादंबरीचे वाचन सुरू आहे. छत्रपती संभाजीराजेंचे जीवन चरित्र या पुस्तकात रेखाटले आहे. पराक्रमी राजा, उत्तम कवी अशी राजांची ख्याती. औरंगजेबाच्या कैदेत असताना लेखकाने केलेले वर्णन अप्रतिम आहे. ते प्रसंग वाचताना नकळत डोळे पाणावतात. मरण यातना सोसत असतानाही स्वाभिमान, स्वराज्याचे हित शंभूराजेंनी त्यागले नाही.

संकटाशी हात करणारा ढाण्या वाघ
श्रीमती सुतेजा सुभाष दांडेकर (सातारा) - डॉ. गजानन रामचंद्र देशमुख. "एका इनामदाराची संघर्षयात्रा,'हे पुस्तक मी वाचले. सौ. कादंबरी देशमुख यांनी शब्दांकन केलेलं. अंगापूरसारख्या खेडेगावातील माणूस सातारा शहरात शिकून डॉक्‍टर होतो व परत आपल्या जमिनीशी इमान राखून अंगापूरलाच प्रॅक्‍टिस करतो. शेतजमिनीसाठी कोर्ट-कचेऱ्या, घर व कुटुंबीय यांच्यासाठी झीज सोसणे हे सर्व त्यांनी डोक्‍यावर बर्फ व तोंडात खडीसाखर ठेवून केले. हा प्रत्येक संकटाशी चार हात करणारा ढाण्या वाघ आहे.

‘मनात’
ऍड. अमित द्रविड (सातारा) - सध्या अच्युत गोडबोले यांचं "मनात' पुस्तक वाचत आहे.

मनकल्लोळ भाग १ आणि २
शिवराज अर्जुन उथळे (शहापूर, ता. कऱ्हाड) - सध्या मी अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांचे मानसिक आजारावरील "मनकल्लोळ भाग १ आणि २' पुस्तक वाचत आहे. अतिशय सुंदर, ओघवत्या, सोप्या भाषेत कन्सेप्ट क्‍लिअर केल्या आहेत. आजचे युग ताणतणाव, काळजी, डिप्रेशनचे आहे. त्या दृष्टीने या पुस्तकातून सर्व मनोविकारांची सखोल माहिती आहे. मनोविकारावरील चित्रपट, पुस्तके, प्रसिद्ध व्यक्तीचे मनोविकार या सगळ्या गोष्टी मनोरंजक आहेत. सर्वसामान्य माणसापासून ते मानसोचारतज्ज्ञांपर्यंत सर्वांना हे पुस्तक उपयुक्त आहे. आपल्या आजूबाजूला कोणाला कोणता डिसऑर्डर आहे आणि आपण कोणत्या डिसऑर्डरची शिकार होऊ शकतो, हे पुस्तक वाचल्यानंतर समजते.

‘द रूम ऑन द रूफ / व्हॅग्रण्टस इन द व्हॅली ’
प्रतीक दोशी (लोणंद, जि. सातारा) - सुप्रसिद्ध अँग्लो इंडियन लेखक रस्किन बॉन्ड यांचं ‘द रूम ऑन द रूफ / व्हॅग्रण्टस इन द व्हॅली’ हे विलक्षण पुस्तक नुकतंच हाती लागलं. १५ ते १६ वर्षांच्या वयातील रस्टीला आलेल्या अनुभवांचं भावपूर्ण चित्रण या कादंबरीत दिसतं. निसर्गसौंदर्याने संपन्न हिमाचल प्रदेशातील डेहराडून परिसरात राहणारा अनाथ रस्टी गार्डियनच्या जाचाला कंटाळून घर सोडतो आणि भेटलेल्या मित्रांच्या सहवासात त्याचा स्वतःला शोधण्याचा प्रवास सुरू होतो. हिमाचलचा निसर्ग, लोकजीवन, रस्टीची मानसिक अवस्था, भेटलेले मित्र हे सगळं वर्णन ओघवत्या शैलीत केलेलं आहे. ‘द रूम ऑन द रूफ’ संपते तिथूनच पुढचा भाग ‘व्हॅग्रण्टस्‌ इन द व्हॅली’ सुरू होतो. या एकाच पुस्तकात दोन कादंबऱ्या वाचायला मिळतात. प्रत्येकानं वाचायला हवं असं हे नितांतसुंदर पुस्तक ‘सकाळ’ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

आंतरिक शक्ती वाढविणारे - द सीक्रेट (रहस्य)
संतोष ह. राऊत (लोणंद, जि. सातारा) - मी सध्या ‘द सीक्रेट’ हे लेखिका राँडा बर्न (मराठी अनुवाद डॉ. रमा मराठे) हे पुस्तक वाचत आहे. हे पुस्तक अतिशय चांगले असून, सकारात्मक दृष्टीने प्रयत्न केल्यास जगात काहीच अवघड नाही हे दाखवून दिले आहे. पुस्तकात आपल्यातील लपलेल्या अप्रकट आंतरिक शक्तीची जाणीव होते. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात रहस्य कसे उपयोगात आणावे हे या पुस्तकातून सहज कळते. पुस्तकातील वैशिष्ट्ये म्हणजे, आधुनिक काळातील प्रतिथयश स्त्री- पुरुषांच्या यशस्वितेमागील युक्ती, कल्पना याबाबत विवेचन असून, अनेक मान्यवर लेखक, तत्त्वचिंतक, धर्मोपदेशक, गुरुवर्याच्या शिकवणुकीचा, अनुभवांचा या सगळ्यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. जगातील कोट्यवधी लोकांना सुखी, आनंदी बनवावे हाच उद्देश या पुस्तकात आहे म्हणून सगळ्यांनी ते वाचले पाहिजे. यावर चित्रपटही बनविला आहे.

रश्‍मी बन्सल यांचे ‘कनेक्‍ट द डॉटस्‌’
ॲड. विशाल माने (तुळसण) - आजच्या तरुण पिढीला खर तर पंतप्रधान मोदी यांनी उद्योजकतेचे धडे गिरवण्यास शिकवले आहे. त्यातूनच मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्कील डेव्हलपमेंट, मुद्रा योजना आदी योजनांवर भर दिलेला आहे. ‘कनेक्‍ट द डॉटस्‌’ हे रश्‍मी बन्सल यांचे पुस्तक प्रत्येक तरुणाने वाचायला हवे. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता एखादे कौशल्य आत्मसात करून उद्योग उभारावेत. स्वत: नोकऱ्या द्याव्यात. स्वत:चे गुण ओळखून धाडस करायला हव. एखादी वेगळी कल्पना तुम्हाला कोटयधीश बनवू शकते, असे त्यात नमूद आहे.

शिवाजी राऊत यांचे ‘ज्ञान रचनावाद’
प्रा. सौ. भारती ज. पवार (सातारा) - शैक्षणिक गुणवत्तेचा विवेकी आग्रह धरणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानरचनावाद. फक्त शाळेच्या वर्गखोल्या, भिंती रंगवल्या, काही आकृत्या वगैरे रेखाटल्या म्हणजे ज्ञानरचनावाद नव्हे, तर बालकांत शिक्षणाची गोडी यावी म्हणून त्याच्या सभोवतालचे वातावरण त्यासाठी पुरक करणे ज्याद्वारे विद्यार्थ्यांना विषयाचे योग्य प्रकारे आकलन होऊन त्या आकलनाचे रूपांतर वर्तनात व्हावे हा ज्ञानरचनावादाचा उद्देश या पुस्तकात सांगितला गेला आहे. एकूनच ज्ञानरचनावाद या संकल्पनेतून मुलांना अधिकाधिक प्रगल्भ कसे बनवायचे, त्यांना मुक्त शिक्षण कसे द्यायचे याचे चांगले ज्ञान या पुस्तकातून मिळाले.

प्रकाशवाटा - अंधारातून उजेडाकडे
श्रेया देसाई (सातारा) - मी सध्या ‘प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे लिखित त्यांचे आत्मचरित्र वाचते. या पुस्तकाच्या नावातच सर्व काही दडले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव खूप दूरवर पसरला आहे. १९७३ मध्ये हेमलकसा या अतिदुर्गम आदिवासी परिसरात सुरू केलेले काम... आदिवासींना मुख्य प्रवाहात कसे आणले, त्यांची पिळवणूक कशा प्रकारे थांबवली आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून दिली... असा हा प्रवास. एका हेमलकशाचा प्रवास कसा ‘अंधारातून उजेडाकडे’ गेला हे सगळे अंतर थक्क करणारे आहे.

हॅप्पी थॉटस्‌
रश्‍मी हेडे (सातारा) - सकारात्मक वाचन केल्याने प्रचंड आत्मविश्‍वास निर्माण होतो. आपले आचार, विचारही बदलतात व आंतरिक गुणांना वाव मिळतो. दिवसाची सुरवात जेव्हा एखादा सुंदर सुविचाराने होते तो दिवस आनंदी व उत्साही जातो. मी अनेक वर्ष ‘हॅपी थॉट्‌स’चे पुस्तक वाचते. विविध विषय व त्याची माहिती मनात घर करून जाते. मी सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव आहे ‘आत्मनिर्भर कसे व्हाल.’ हे पुस्तक खास महिलांसाठी आहे. या पुस्तकातील माहिती प्रेरणा देणारी आहे. जसे जी स्त्री घराला स्वर्ग बनवू शकते, ती विश्‍वालादेखील स्वर्ग बनवू शकते.

(‘भारताचे संविधान’ वाचत असल्याचे सुरेश जाधव (वाई), ऊर्मिला पवार यांचे ‘आयदान’ वाचत असल्याचे अशोक मोहिते (दहिवडी) व विश्‍वास नांगरे- पाटील यांचे ‘मन में हैं विश्‍वास’ वाचत असल्याचे अनिरुद्ध गायकवाड (गोडोली) यांनी कळवले आहे.)

पुस्तक भिशी..!

भिशी मंडळ म्हटले, की खानपानाची रेलचेल, मैत्रिणींसोबत निवांतपणा व्यतीत करण्यासाठी राखून ठेवलेली वेळ, नव्या साडीपासून टीव्ही मालिकांच्या कथानकापर्यंत कोणत्याही विषयाचे बंधन नसलेले व्यासपीठ अशी त्याची सर्वसाधारण व्याख्या...; पण नेमक्‍या याच संकल्पनेला छेद देत साताऱ्यातील मैत्रिणींनी ‘पुस्तक भिशी’ मंडळ चालविले आहे. वाचलेल्या पुस्तकांचे रसग्रहण करण्यासाठी जमणाऱ्या या मंडळातील महिला गेल्या तीन वर्षांपासून कृतिशीलपणे सहभाग देत आहेत.

- शैलेन्द्र पाटील, सातारा.

होय.., होय.. पुस्तक भिशी ! साताऱ्यातील स्वाती राऊत, ॲड. सिमंतीनी नूलकर यांनी या अनोख्या पुस्तक भिशीची संकल्पना काही मैत्रिणींपुढे मांडली. २०१४ मध्ये कोणतीही वर्गणी न काढता या उपक्रमाला सुरवात झाली. या महिला महिन्यातून एकदा जमतात. त्याठिकाणी आधी ठरल्याप्रमाणे एक सदस्या आपण नव्याने वाचलेल्या पुस्तकासंदर्भात सर्वांपुढे विचारांची मांडणी करते. त्यानंतर प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम होते. साधारणपणे तास-दीड तास हा कार्यक्रम चालतो. श्रीमती राऊत, ॲड. नूलकर यांच्यासह भारती महाडिक, आशा देशमुख, डॉ. धनश्री पाटील, गौरी वैद्य, हर्षल राजेशिर्के, चित्रलेखा वाडीकर, विजया जोशी, मनीषा शिर्के, मधू माने, सविता नांगरे, सविता कारंजकर, कल्याणी थत्ते, सविता लेले, सुनेत्रा आगाशे, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. मेधा क्षीरसागर, डॉ. परिक्षिता भोसले, अनुष्का कर्णे, गार्गी राऊत, डॉ. शुभांगी सहस्त्रबुद्धे, चित्रा भिसे, प्रा. शोभा पाटील, मनुजा अवसरे, अनघा नलवडे, हेमा पवार या महिला त्या भिशी मंडळाच्या सदस्या आहेत.

याविषयी ‘सकाळ’शी बोलताना स्वाती राऊत म्हणाल्या, ‘‘वाचन संस्कृती रुजविणे आणि त्यातून ज्ञानग्रहणाबरोबरच कृतिशील सामाजिक भान वाढविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या भिशीत एका रुपयाचाही व्यवहार होत नाही. सर्वसाधारणपणे एका महिन्यात एक पुस्तक वाचून होते. याबरोबरच आणखी एका पुस्तकाचे रसग्रहण त्रयस्ताच्या नजरेतून करायला मिळते. पुस्तके अनुभव समृद्ध करतात, याचा प्रत्यय आम्ही घेत आहोत.’’

पुस्तक वाचनाबरोबरच मंडळातील सदस्य विविध सामाजिक उपक्रमातही आपल्यापरीने योगदान देतात. अर्थात हा ज्याचा त्याचा ऐच्छिक विषय असतो. विविध विषयांचा परामर्श यानिमित्ताने घेतला जातो. भाषेची समज वृद्धिंगत व्हायला मदत होते. यातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले. या मंडळात काही सदस्या गृहिणी आहेत. कोणी डॉक्‍टर-वकील, शिक्षिका-प्राध्यापिका, बॅंका- एलआयसीतील नोकरदार अशा विविध वाचन व आर्थिक स्तरातील आणि स्वत:च्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असणाऱ्या आहेत. त्यामुळे स्वत:च्या आवडीच्या पुस्तक वाचनाबरोबरच इतर विषयांतील चांगल्या पुस्तकांचे रसग्रहण याठिकाणी होते. ‘पुस्तक भिशी’चा हा अनोखा उपक्रम खरोखरच अनुकरणीय आहे!  

कविमनाचा थोर वैज्ञानिक (अच्युत गोडबोले, दीपा देशमुख)

‘वनस्पतींनाही संवेदना असतात’, असा महत्त्वपूर्ण शोध लावणारे विख्यात वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बोस यांचं याशिवायही आणखी दोन क्षेत्रांत मोठं योगदान आहे. एक म्हणजे मिलिमीटरमध्ये तरंगलांबी असणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी निर्माण करण्याच्या पद्धतीचा शोध आणि दुसरं म्हणजे, हेन्‍रिक हर्ट्‌झ यांनी रचना केलेल्या विद्युत चुंबकीय लहरींचं अस्तित्व शोधणाऱ्या ‘कोहरर’ नावाच्या उपकरणात त्यांनी केलेल्या मूलभूत सुधारणा! ‘भारतीय जिनिअस’ असलेल्या या जगद्विख्यात वैज्ञानिकाच्या कार्याची ही ओळख...


भौतिकशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र यांच्यातल्या नेत्रदीपक संशोधनामुळं डॉ. जगदीशचंद्र बोस (३० नोव्हेंबर १८५८-२३ नोव्हेंबर १९३७)
यांना सगळं जग ओळखतं. बोस यांनी वनस्पतिविश्‍वात मौलिक संशोधन करून ‘वनस्पती सजीव असतात’, हे जगाला पहिल्यांदा दाखवून दिलं! ब्रिटिश सरकारनं बोस यांना ‘सर’ या किताबानं सन्मानित केलं. भारतात संशोधनाला चालना मिळावी म्हणून त्यांनी कलकत्ता (सध्याचं नाव ः कोलकता) इथं ‘बोस इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली आणि ती संस्था देशाला समर्पित केली. बोस यांनी भारतीय विज्ञान परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं. सन १९३१ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचा सत्कार करून ‘आचार्य’ ही पदवी त्यांना दिली.

रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय अशी अनेक थोर मंडळी बोस यांची समकालीन होती. त्या वेळी देशात विज्ञानाच्या शोधाबद्दल अतिशय निष्क्रियता आणि उदासीनता होती. बोस यांचं कार्य किती अनमोल होतं, हे त्या वेळची परिस्थिती पाहता लक्षात येतं. बोस यांचं महत्त्वाच्या दोन क्षेत्रांत योगदान आहे. एक म्हणजे मिलिमीटरमध्ये तरंगलांबी असणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी निर्माण करण्याच्या पद्धतीचा शोध आणि दुसरं म्हणजे, हेन्‍रिक हर्टझ यांनी रचना केलेल्या विद्युतचुंबकीय लहरींचं अस्तित्व शोधणाऱ्या ‘कोहरर’ नावाच्या उपकरणात त्यांनी केलेल्या मूलभूत सुधारणा!

बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी बांगलादेशातल्या (पूर्वीचं पूर्व बंगाल) ढाका जिल्ह्यातल्या राणीखल या छोट्याशा गावात मेमनसिंह या भागात झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र हे फरीदपूर इथं सरकारी नोकरीत अधिकारी होते. बोस यांची आई बामसुंदरी ही अतिशय प्रेमळ गृहिणी होती. लहानग्या जगदीशचंद्रला निसर्गातल्या अनेक गोष्टींचं कुतूहल वाटत असे आणि वडील भगवानचंद्र हे मुलाच्या ‘का?’ या प्रश्‍नाला कधीही कंटाळत नसत. आपल्या मुलाचं कुतूहल नेहमीच जागतं राहिलं पाहिजे, याची जाणीव त्यांना होती. ‘सगळी झाडं एकाच वेळी फुलं का देत नाहीत?’ ‘प्रत्येक झाडाच्या पानाचा हिरवा रंग वेगवेगळा का असतो?’ असे अनेक प्रश्‍न विचारून आपल्या वडिलांना जगदीशचंद्र भंडावून सोडी. त्या वेळी मुलांना इंग्लिश शाळांमध्ये शिकायला पाठवणं प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जात असे. मात्र, ‘इंग्लिश माध्यमाच्या खोट्या गर्वामुळं माणूस इतरांपासून स्वतःला वेगळा समजायला लागतो; त्यामुळं आपल्या मुलानं सगळ्यांमध्ये राहून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालं पाहिजे आणि मुलाचा सहज आणि स्वाभाविक विकास मातृभाषेच्या वातावरणातच जास्त चांगला होतो,’ असं भगवानचंद्र यांचं मत होतं.

शालेय शिक्षण झाल्यानंतर बोस यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शाखेत प्रवेश घेतला.  कलकत्त्याच्याच केंब्रिज केमिल्टन या विश्‍वविद्यालयातून त्यांनी एमए केलं. ‘तुम्ही तुमच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवावं,’ असा सल्ला प्राध्यापकांनी भगवानचंद्र यांना दिला. त्या काळी परदेशी जाणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. बोस यांच्या आईनं दागिने विकून त्यांचा परदेशी जाण्याचा मार्ग मोकळा केला. इंग्लंडला पोचताच त्यांचा वैद्यकशाखेतला अभ्यास सुरू झाला; पण तिथल्या प्रयोगशाळेत येणाऱ्या विशिष्ट वासाची ॲलर्जी झाल्यानं लंडन विद्यापीठातलं वैद्यकशाखेचं शिक्षण बोस यांना अर्धवट सोडून द्यावं लागलं. पुढं नंतर केंब्रिजच्या ख्राईस्ट महाविद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र असे विषय घेऊन त्यांनी अभ्यास केला. केंब्रिज आणि लंडन विद्यापीठातून पदव्या प्राप्त करून बोस भारतात परतले.

भारतात परतल्यावर ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या तासाच्या वेळी पुढच्या बाकावर बसायला जागा मिळावी म्हणून सगळे विद्यार्थी धडपडत असत. आपल्या घराच्या एका भागात बोस यांनी छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती.

दिवसभर महाविद्यालयात शिकवून घरी परतल्यावर तिथं त्यांचं संशोधन चाले. प्रयोगशाळेत लागणारी अनेक उपकरणं त्यांनी स्वतःच बनवली होती. ‘कोहरर’ नावाच्या विद्युतलहरीशोधक यंत्रात बोस यांनी महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. याच दरम्यान त्यांनी ‘ऑन पोलरायजेशन ऑफ इलेक्‍ट्रिक रेज्‌ बाय डबल रिफ्रॅक्‍टिंग क्रिस्टल्स’ नावाचा पहिला शोधनिबंध लिहिला. सन १८९५-९६ मध्ये लंडन विद्यापीठानं त्यांना डॉक्‍टरेट दिली.

बोस हे अतिशय शिस्तशीर होते. ‘शिस्तीमुळं माणसाला कामं वेळेवर करायची सवय लागते,’ असं ते म्हणत. अगदी लहानसहान गोष्टीतही बोस यांचा कलात्मक स्वभाव दृष्टीस पडत असे. जेवताना ताटात वाढलेले पदार्थ कशा रीतीनं वाढले आहेत, याकडंही त्यांचं विशेष लक्ष असायचं. मनमिळाऊ स्वभावामुळं बोस यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. विनोदी किश्‍शांचा भरपूर साठा बोस यांच्याकडं होता. आपल्या गोष्टीत ते अनेक विनोद पेरत असत. जातिभेदाला त्यांच्याकडं थारा नव्हता. मानवता आणि माणुसकी, हीच मूल्यं त्यांच्या लेखी सर्वश्रेष्ठ होती.

रेडिओतरंग ‘डिटेक्‍ट’ करण्यासाठी एका सेमीकंडक्‍टर जंक्‍शनचा उपयोग करणारे बोस हे पहिले वैज्ञानिक होते. त्यांनी या पद्धतीमध्ये अनेक मायक्रोव्हेव कॉम्पोनंट्‌सचे शोध लावले. त्या वेळी गुग्लील्मो मार्कोनी आणि ऑलिव्हर लॉज हे शास्त्रज्ञदेखील या विषयावर काम करत होते. मार्कोनी यांच्या आधीच, म्हणजे सन १८९५ मध्येच, बोस यांनी ‘रेडिओतरंग पक्‍क्‍या भिंतीतून आरपार जाऊ शकतात,’ हे जाहीरपणे प्रयोग करून दाखवून दिलं होतं. बिनतारी संदेशयंत्रणेचे संशोधक म्हणून मार्कोनी यांची प्रशंसा आज अनेक विदेशी ग्रंथांतून केली जाते; पण या संशोधनाचं खरं श्रेय मात्र बोस यांनाच जातं! ‘एन्सायक्‍लोपीडिया ब्रिटानिका’ या ग्रंथात हर्टझ, लॉज आणि बोस यांच्याही योगदानाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बोस यांनीच पी-टाईप आणि एन-टाईप सेमीकंडक्‍टर यांच्या अस्तित्वाचं भाकीत केलं होतं. आजचा रेडिओ, टीव्ही, रडार, भूतलीय संचार रिमोट सेन्सिंग, मायक्रोव्हेव आणि इंटरनेट या क्षेत्रातल्या प्रत्येकाला बोस यांचं आजन्म ऋणी राहावं लागेल.

यानंतरच्या काळात बोस यांनी वनस्पतिशास्त्राकडं मोर्चा वळवला. ‘वनस्पतींना संवेदना असतात’, याचबरोबर ‘सजीव आणि निर्जीव यांच्यातल्या सीमारेषा खूपच धूसर असतात,’ असं त्यांच्या लक्षात आलं. आपल्या शरीरावर होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया वनस्पतीदेखील प्रकट करून दाखवतात, हे दाखवण्यासाठी त्यांनी ‘ऑप्टिक लिव्हर’ नावाचं एक यंत्र तयार केलं. ‘अन्नामधली जीवनसत्त्वं, अमली पदार्थ आणि अल्कोहोल किंवा विष यांचा जसा मनुष्यप्राण्यावर परिणाम होऊ शकतो, तसाच तो वनस्पतींवरही होतो,’ असा निष्कर्ष बोस यांनी मांडला. बोस यांनी काढलेल्या निष्कर्षाची त्या काळी परदेशातल्या काही शास्त्रज्ञांनी खूप टिंगल केली.

‘आमच्यासमोर एखाद्या वनस्पतीला विष देऊन गलितगात्र करून दाखवा, तरच आम्ही तुमचा शोध खरा समजू’ असं आव्हानही बोस यांना देण्यात आलं. बोस यांच्या जागी अन्य कुणी संशोधक असता तर तो अशा आव्हानानं गडबडून गेला असता; पण बोस यांचा स्वतःवर आणि स्वतःच्या संशोधनावर अपार विश्‍वास होता. त्यांनी हे आव्हान शांतपणे स्वीकारलं. ठरलेल्या वेळी शेकडो लोक जमा झाले. ‘आता काय होतंय’ याची सगळ्यांना उत्कंठा होती. विरुद्ध गटातल्या शास्त्रज्ञांनी बोस यांच्या हाती विषाची पूड ठेवली. बोस यांनी ती विषाची पूड वनस्पतींना घातली; पण बराच वेळ होऊनही वनस्पतींवर कुठलाच परिणाम दिसला नाही. त्या पूर्वीप्रमाणेच टवटवीत दिसत होत्या. ‘बोस हे फसवे आणि खोटारडे आहेत,’ अशी हेटाळणी करून जमलेले लोक आणि शास्त्रज्ञ त्यांची हसून हसून खिल्ली उडवायला लागले. ‘‘विषा’चा वनस्पतींवर परिमाण झालेला नाही, याचा अर्थ ती पूड म्हणजे विष नसावंच,’ असा विचार बोस यांच्या मनात क्षणभरात तरळून गेला.

गलका करणाऱ्या जमावाला बोस यांनी शांत केलं आणि ‘या प्रयोगासाठी विष म्हणून माझ्या हाती जी पूड देण्यात आलेली आहे, ती पूड म्हणजे विष नव्हेच,’ असं उपस्थित शास्त्रज्ञांना त्यांनी शांतपणे सांगितलं. बोस हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर शिल्लक राहिलेली ‘विषा’ची पूड त्यांनी लगेचच तोंडात टाकली! ‘हे जर विष असेल, तर माझा मृत्यू होईल,’ असं ते म्हणाले. जमलेले लोक श्‍वास रोखून पाहू लागले. बोस आता क्षणार्धात कोसळतील, असंच लोकांना वाटत होतं; पण तसं काहीच झालं नाही. कारण, त्या शास्त्रज्ञांनी विषाऐवजी मुद्दामच साखरेची पूड आणलेली होती. लोकांसमोर खरा प्रकार उघडकीस आला. आता मात्र टिंगलटवाळी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या माना शरमेनं खाली झुकल्या. बोस यांची आणि जमलेल्या लोकांची त्यांनी जाहीर माफी मागितली आणि ते तिथून चालते झाले.

बोस यांना ‘बंगाली विज्ञानकथेचा जनक’ असं संबोधलं जातं. आपला विज्ञानविषयक कथासंग्रह टागोर यांना भेट देताना बोस म्हणाले होते ः ‘‘तेजानं तळपणाऱ्या ‘सूर्या’लाही एका ‘काजव्या’ची छोटी भेट’’! त्यावर बोस यांना टागोर म्हणाले होते ः ‘‘तू जर विज्ञानाच्या क्षेत्रात पडला नसतास तर सरस्वतीनं तुझ्या हातून उत्तमोत्तम साहित्यकृती लिहून घेतल्या असत्या.’’ पाश्‍चिमात्यांना टागोर यांची प्रतिभा ठाऊक व्हावी, यासाठी बोस यांनी टागोर यांच्या साहित्याचं भाषांतर करून ते प्रसिद्ध केलं. त्यामुळंच टागोर यांची प्रतिभा जगाला ज्ञात झाली.

सन १९१५ मध्ये बोस प्राध्यापकपदावरून निवृत्त झाले; पण त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. ता. २३ नोव्हेंबर १९३७ रोजी हृदयक्रिया बंद पडल्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं केवळ विज्ञानविश्वातच नव्हे; तर साहित्यप्रांतात, काव्यविश्वातही दुःखाचं सावट पसरलं.

त्यांच्या मृत्यूनंतर मायकेल सॅंडलर म्हणाले होते ः  ‘‘जगदीशचंद्र बोस हे केवळ वैज्ञानिकच नव्हते, तर ते कवीही होते. कवी शेले जर त्यांच्या काळात असता, तर बोस यांच्याकडं बघून तो चक्क विज्ञानाकडं वळला असता!’’ केंब्रिजमधल्या ख्राईस्ट कॉलेज युनिव्हर्सिटीत बोस यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे. भारत सरकारनंही त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपालतिकीट काढलं होतं. बोस यांच्या देणगीमूल्यातून आजही शास्त्रीय आणि सामाजिक कार्य पार पाडली जातात. बोस यांचे विद्यार्थी मेघनाद साहा आणि सत्येंद्रनाथ बोस (एस. एन. बोस) यांनी भौतिकशास्त्रज्ञ म्हणून गुरूचं कार्य पुढं नेलं आणि आपल्या कार्यानं जगात भारताची मान उंचावली!

न्यूटन, गॅलिलिओसारखे सूर्य पुन्हा होणे अवघड

 साधारणः एक लाख वर्षांपूर्वी माणसाचा जन्म झाला. त्या वेळी पडलेल्या "का?' या प्रश्‍नाने माणसाने मोठी प्रगती साधली. आयआयटीत शिकताना भेटलेल्या माणसांमधून माझ्यात लिखाणाची बिजे रोवली गेली. त्यातून विज्ञानासह अन्य विषयांवर लिहीत गेलो. "जीनियस', "किमयागार' या पुस्तकांनी वेगळी ओळख मिळवून दिली. महान शास्त्रज्ञ न्यूटन, गॅलिलिओ, आइनस्टाईन यांच्या कामगिरीने खरोखर डोळे दीपतात. त्यांच्यासारखे सूर्य पुन्हा होणे अवघड आहे, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले यांनी  व्यक्त केले.


(कै.) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक केंद्रातर्फे राज्याचे शिल्पकार (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या 32 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला "जग बदलणारे जीनियस' या विषयावर झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर वनाधिपती विनायकदादा पाटील, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्‍वास ठाकूर, सचिव डॉ. मनोज शिंपी आदी उपस्थित होते.

एकविसाव्या शतकात मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाच्या दिशा बदलत असून, ती जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करीत आहे. तसेच माहिती, उपयुक्तता व नव्या अनुभवाच्या शोधात तंत्रज्ञानाभिमुख होत असल्याची माहिती श्री. गोडबोले यांनी दिली. त्यांनी "जीनियस', "किमयागार' या पुस्तकांच्या वाचनापासून 12 लोक आत्महत्येपासून परावृत्त झाल्याचे सांगितले.

ज्येष्ठ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. दीपा देशमुख यांनी व्याख्यानात विदेशी शास्त्रज्ञांसह आर्यभट्ट, भास्कराचार्य, डॉ. होमी भाभा, डॉ. स्वामीनाथन ते जयंत नारळीकर, सर विश्‍वेसरय्या यांचाही आदराने उल्लेख केला. संस्थेचे सचिव मनोज देशपांडे यांनी श्री. गोडबोले यांचा परिचय करून दिला. केंद्राच्या सदस्या कविता कर्डक यांनी डॉ. देशमुख यांचा सत्कार केला. दरम्यान, गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य सभागृहात झालेल्या व्याख्यानास ज्येष्ठांसह चिमुरड्यांची मोठी गर्दी झाल्याने आयोजकांना सतरंजीची व्यवस्था करावी लागली.

मुलांत ध्येयापेक्षा कुतूहल जागवा - अच्युत गोडबोले

'मुलांसमोर ध्येय ठेवून, त्यामागे धावायला लावण्यापेक्षा त्यांच्यातील कुतूहल जागे ठेवा. तेवढे केलेत तरी मुलांनी निम्मी शर्यत जिंकल्यासारखी आहे,' असे मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक अच्युत गोडबोले यांनी आज व्यक्त केले. संवाद समुपदेशन केंद्रातर्फे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित 'बालक-पालक संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर 'सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी होते. कार्यक्रमाचे संयोजक अर्चना मुळे यांनी स्वागत केले.


गोडबोले म्हणाले, "गुणांच्या शर्यतीतील मुलांचे बाल्य हरवतेय. शिक्षणातील सौंदर्य हरवून रेडीमेड विचारांची सवय लावतेय. शिक्षक स्वतः विद्यार्थी राहिलेच नाहीत. त्यांनी शिकणे थांबवले आहे. जग झपाट्याने बदलत असताना बदल स्वीकारण्याचे संस्कार मुलांवर बिंबवण्याची पहिली गरज आहे. गेल्या दहा वर्षांतील बदल सहस्रकातील सर्वांत वेगवान आहेत. जुन्याला चिकटून बसण्याची वृत्ती सोडून नव्याचा आनंद घेतला पाहिजे. फक्त परीक्षेसाठी अभ्यास, ही संकल्पनाच नको. विषयाची गोडी मुलांना चाखू द्या. घोकमपट्टी, गाईड हवीत कशाला?''

गोडबोले पुढे म्हणाले, "विज्ञान, तंत्रज्ञान सर्वोत्तम, कारण ते पैसे देतात, अशा विचारसरणीत साहित्य, संगीत, चित्रकलेला दुय्यम झालेय. आयुष्य म्हणजे फक्त हिशेब; सर्वांगीण आनंद कुठाय? पालक, शिक्षकांत त्याविषयीची उदासीनता अस्वस्थ करणारी आहे. सृष्टीच्या मूलतत्त्वाविषयी मुलांत कुतूहल दिसू द्या. आपण आत्मकेंद्री, स्वार्थी, चंगळवादी बनलोय. लोक काय म्हणतील याची भीती वाटते, ती भीती मुलांच्या मनात रुजू देऊ नका.''
शाल्मली वझे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर माधवी ठाणेकर यांनी परिचय करून दिला. डॉ. प्रांजली माळी यांनी आभार मानले. मानसी लागू, सुधा पाटील, तन्मय शेडबाळे आदींनी नियोजन केले कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

मराठी संवादभाषा  अच्युत गोडबोले म्हणाले, ""मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, हा प्रयत्न मी करतोय; त्याचा मूळ हेतू भाषेची मूलतत्त्वे लोकांत पोचवण्याचा आहे. ही संवादभाषा व्हावी, हाच प्रयत्न आहे.''

विषमता (अच्युत गोडबोले)

भारतात गेल्या पंधरा वर्षांत विषमता प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसतं. ही विषमता फक्त मिळकत आणि संपत्ती यांच्याबाबत नव्हे, तर ती पाणी, आरोग्य आणि इतरही सर्व बाबतीत वाढली आहे. हे भांडवलशाहीचं अपयश आहे. वाढत्या विषमतेकडे फक्त मानवतेच्याच दृष्टिकोनातून बघता कामा नये. त्याचा अर्थव्यवस्थेशीही संबंध असतो. एका मर्यादेपलीकडली विषमता लोकांकरता आणि एकूण अर्थव्यवस्थेच्या आरोग्यासाठी वाईटच. ती आटोक्‍यात आणली नाही, तर आज नाही तरी काही वर्षांत मोठी मंदी येण्याची आणि लोकांच्या प्रक्षोभाचा उद्रेकही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.


गेल्या 25-28 वर्षांत भारतात विषमता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातल्या गेल्या 15 वर्षांत तर ती प्रचंडच मोठ्या प्रमाणात वाढली. ही विषमता फक्त मिळकत आणि संपत्ती यांच्याबाबत नव्हती, तर ती पाणी, आरोग्य आणि इतरही सर्व बाबतीत वाढली. जागतिकीकरणानंतर होणारी प्रगती तळागाळात पोचेल अशी "ट्रिकल डाऊन थिअरी' जागतिकीकरणाचे समर्थक नेहमी मांडतात; पण तसं "ट्रिकल डाऊन' झालं असतं तर इतक्‍या वर्षांत विषमता कमी झाली असती. निदान वाढली तरी नसती. या उलट आपल्याला या देशात "ट्रिकल अप'च बघायला मिळतंय. अजूनही पैसा असो किंवा पाणी, गरिबांकडून श्रीमंतांकडे, शेतीकडून उद्योगाकडे आणि खेड्याकडून शहरांकडे त्यांचा ओघ येत राहिला.

क्रेडिट स्वीस ही संस्था 2014 पासून "ग्लोबल वेल्थ डेटा बुक' प्रकाशित करते. त्यात 130 देशांच्या दरडोई संपत्तीविषयी तौलनिक माहिती असते. त्या अहवालानुसार, भारतात एक टक्का श्रीमंत लोकांची 58.4 टक्के संपत्तीवर मालकी आहे. अमेरिकेमध्ये मात्र सगळ्यात जास्त श्रीमंत एक टक्का लोकांची 42.1 टक्के संपत्तीवर मालकी आहे. भारतात दहा टक्के श्रीमंत लोकांकडे 80.7 टक्के संपत्ती आहे; तर अमेरिकेत दहा टक्के श्रीमंत लोकांकडे 57.6 टक्के संपत्ती आहे. थोडक्‍यात भारतात अमेरिकेपेक्षाही खूपच जास्त विषमता आहे.

सर्वांत खालच्या तीस टक्के जनतेकडे बघितलं, तर अगदी उलट चित्र दिसेल. भारतातल्या खालच्या दहा टक्के लोकांकडे भारतातली -0.7 टक्के संपत्ती आहे. म्हणजे ते कर्जबाजारीच आहेत. त्यापुढच्या दहा टक्के लोकांकडे भारतातली 0.2 टक्के संपत्ती आहे; तर त्यापुढच्या दहा टक्के लोकांकडे भारतातली 0.5 टक्के संपत्ती आहे. म्हणजे सर्वांत खालच्या तीस टक्के लोकांकडे काहीच संपत्ती नाही. थोडक्‍यात ते कफल्लक आहेत. त्या बरोबर भारतातल्या सर्वांत खालच्या नव्वद टक्के लोकांकडे भारतातली फक्त 19.3 टक्के संपत्ती आहे. म्हणजे भारतात सर्वांत श्रीमंत एक टक्का लोकांकडे सर्वांत खालच्या नव्वद टक्के लोकांकडे असलेल्या संपत्तीच्या तिप्पट संपत्ती आहे.

यातला वाईट भाग असा, की ही विषमता दिवसेंदिवस वाढतच चाललीय. उदारहणार्थ वरच्या एक टक्का लोकांकडे 2000 मध्ये देशातली 36 टक्के संपत्ती होती. 2014 मध्ये ती 49 टक्के, 2015 मध्ये 53 टक्के आणि 2017 मध्ये 58.4 टक्के होती. भारतात 2000 मध्ये नऊ अब्जाधीश होते. ते 2009 मध्ये ते 53 झाले, तर 2017 मध्ये 101 झाले. थोडक्‍यात भारतात 17 वर्षांत अब्जाधीशांची संख्या 11 पटींपेक्षा जास्त वाढली; पण त्याच वेळी सर्वांत खालच्या दहा टक्के लोकसंख्येची संपत्ती +0.1 टक्‍क्‍यांवरून -0.7 टक्‍क्‍यांवर गेली. त्यापुढच्या दहा टक्‍क्‍यांची संपत्ती 0.4 टक्‍क्‍यावरून 0.2 टक्‍क्‍यांवर गेली आणि त्यापुढची दहा टक्‍क्‍यांची संपत्ती 0.7 टक्‍क्‍यावरून 0.7 टक्‍क्‍यांवर गेली! एवढ्या प्रचंड प्रमाणात विषमता जगात दुसऱ्या कोणत्याही देशात वाढलेली नाही.

नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांच्या मते, "जेव्हा कंपनीचा सीईओ आणि सर्वांत खालचा कामगार यांच्या पगारात शंभर पटींचा फरक असतो, तेव्हा ते एक विषमतेचं अरिष्ट असतं आणि जेव्हा हा फरक एक हजारपट होतो, तेव्हा ते लोकशाहीवरचं अरिष्ट असतं.' मात्र, भारतात तर हे चित्र यापेक्षाही महाभयानक आहे. उदाहरणार्थ, अनेक कंपन्यामध्ये सीईओचा पगार आणि साध्या कामगाराचा पगार यांच्यातला फरक शंभरपट नव्हे, दहा हजारपटही नव्हे, तर चक्क तीस ते चाळीस हजारपट आहे! सत्तेचं इतकं प्रचंड केंद्रीकरण जगात दुसऱ्या कुठंही नसेल!
कोणी म्हणेल, विषमता वाढली म्हणून काय झालं? तळातल्या लोकांचही जीवनमान खूप सुधारलं की नाही? या संदर्भात आज ग्रामीण भारतात लोकांची मिळकत काय आहे? 2013-14 च्या "सोशो-इकॉनॉमिक कास्ट सेन्सस'नुसार 75 टक्के ग्रामीण लोकांमध्ये मुख्य कमावणाऱ्या माणसाला सरासरी दरमहा 5000 रुपयांपेक्षा कमी मिळत होते, तर नव्वद टक्के लोकांमध्ये मुख्य कमावणाऱ्या माणसाला दरमहा सरासरी दहा हजार रुपयांपेक्षा कमी मिळत होते. 2014 मध्ये प्रकाशित झालेल्या "नॅशनल सॅंपल सर्व्हे'नुसार शेतकरी कुटुंबाचं सरासरी उत्पन्न दरमहा फक्त 6,426 रुपये आहे. यात सगळ्या तऱ्हेची मिळकत धरली आहे. एवढ्याशा या उत्पन्नात त्या शेतकऱ्याला पाच माणसांचं कुटुंब चालवायचं असतं. त्यात घर, अन्न, पाणी, कपडे, प्रवास, आरोग्य, शिक्षण आणि करमणूक असे अनेक खर्च भागवायचे असतात. अशा कुटुंबात एक जरी मोठा आजार झाला, तरी ते संपूर्ण कुटूंब आयुष्यभर कर्जबाजारी होतं. अधिकृतरित्या भारतात दारिद्रयरेषेखाली फक्त 22 टक्के लोक आहेत. हे जरी असलं, तरी शिक्षण, आरोग्य अशा इतर गोष्टी विचारात घेऊन "मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्‍स' लक्षात घेतला, तर भारतातले जवळपास पन्नास टक्के लोक गरीब आहेत यावर दुमत नाही. याशिवाय दारिद्रयरेषेचं मोजमाप करायची पद्धतच कशी चुकीची आहे आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हेचीच आकडेवारी वापरून दारिद्रयरेषेखाली असणाऱ्यांचं प्रमाण भारतात 75-77 टक्के कसं आहे, हेही प्रा. उत्सा पटनाईक यांनी दाखवून दिलंय. या आकडेवारीविषयी मतभेद असले, तरी भारतात किमान पन्नास-साठ टक्के लोक अत्यंत हलाखीचं आणि असुरक्षित आयुष्य जगताहेत यात शंकाच नाही- आणि स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी आणि जागतिकीकरणानंतर 27 वर्षांनी ही स्थिती असावी ही नामुष्कीच आहे!

क्रेडिट स्वीसच्या 15 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेल्या "ग्लोबल डेटा रिपोर्ट'नुसार, भारतातल्या 92 टक्के प्रौढांकडे सरासरी प्रत्येकी फक्त दहा हजार डॉलर्स (म्हणजे साडेसहा लाख रुपये) किंवा कमी एवढी संपत्ती किंवा मालमत्ता आहे. आजचे जागांचे, सोन्या-चांदीचे आणि इतरही अनेक गोष्टींचे भाव लक्षात घेता साडेसहा लाखांत काय येणार? आणि ही एका वर्षाची कमाई नाहीये, तर संपूर्ण आयुष्यात बचत करून साठवलेली संपत्ती आहे! यातले तीस टक्के तर पूर्णपणे कफल्लक आहेत, तर त्यापुढची वीस टक्के जनता हलाखीच्या अवस्थेत जगत आहे. दुसऱ्या टोकाला 1820 प्रौढांकडे प्रत्येकी सरासरी पाच कोटी डॉलर्सपेक्षा (म्हणजे आजच्या 325 कोटी रुपयांपेक्षा) जास्त, तर 760 प्रौढांकडे दहा कोटी डॉलर्सपेक्षा (आजच्या 650 कोटी रुपयांपेक्षा) जास्त संपत्ती आहे!

खरं तर हे भांडवलशाहीचं अपयश नाही का? "पूर्ण स्पर्धात्मक भांडवलशाहीमुळे उत्पादन केलेल्या वस्तूंची किंमत खाली राहील आणि त्यांचा दर्जा वाढेल आणि त्यामुळे फक्त भांडवलदारांचाच नव्हे तर सर्वसामान्य जनतेचाही फायदाच होईल,' असं भांडवलशाहीचं मूलतत्त्व ऍडम स्मिथनं 1776 मध्ये सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर साधारणपणे अडीचशे वर्षं झाली; पण भारतात आणि जगातही गरिबी आणि बेरोजगारी यांचे राक्षस काही मेलेले नाहीत. (अमेरिकेमध्येही 13-14 टक्के लोक तिथल्या दारिद्रयरेषेखाली आहेत!) सोव्हियत युनियनमध्ये क्रांतीनंतर जेमतेम तीस-चाळीस वर्षांनंतर रेशनसाठी कशा रांगा लागतात याची वर्णनं वाचून साम्यवाद कसा अपयशी ठरला याविषयी तावातावानं बोलणाऱ्या समाज, अर्थतज्ज्ञांना भांडवलशाहीच्या अडीचशे वर्षांनंतर भूक, बेरोजगारी, रोगराई, पर्यावरणाचा ऱ्हास, इतर देशांतल्या साधनसंपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी झालेली असंख्य युद्धं, जगभर वाढलेले मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्‍सेस, नोकरीमध्ये आणि आयुष्यात प्रचंड वाढलेली अस्थिरता, वाढणारी मक्तेदारी आणि वाढता क्रोनी कॅपिटॅलिझम, प्रचंड वाढणारी विषमता, सतत येणारे तेजी-मंदीचे बुडबुडे, वाढता भ्रष्टाचार (उदाहरणार्थ, आपण 1991 मध्ये खुलं आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर भ्रष्टाचारही प्रचंड वाढला आणि तेजी-मंदीचे बुडबुडे खूप वारंवार आणि मोठे यायला लागले), या सगळ्यामध्ये भांडवशाहीचं अपयश मात्र दिसू नये, त्यांना हे फक्त एक ऍबरेशन वाटावं हा चक्क ढोंगीपणा आहे, हे नक्की. सोव्हिएत मॉडेल योग्य नव्हतंच. मुख्य म्हणजे त्यात लोकशाही नव्हती आणि ते मॉडेल नाकारायलाच हवं होतं; पण मग त्याच न्यायानं आज जे भांडवलशाहीचं भयानक स्वरूप आहे, ते बदलायला पाहिजे आणि त्यावर ठिगळं लावून काहीही होणार नाही; तसे प्रयत्न आजपर्यंत फसलेले आहेत; त्यामुळे नव्यानं तातडीनं विचार करायची गरज आहे, असं आजच्या "विचारवंतांना' वाटत नाही आणि त्यावर चर्चासत्रं होत नाहीत हे विचित्रच आहे. आहे ही व्यवस्था जणू काही देवानंच दिली आहे, "देअर इज नो अल्टरनेटिव्ह (टिना),' अशाच थाटात हे अर्थतज्ज्ञ आणि "विचारवंत' रात्री नऊच्या टीव्ही डिबेट्‌समध्ये बोलत असतात हे भयानक आहे.
वाढत्या विषमतेकडे फक्त मानवतेच्याच दृष्टिकोनातून बघता कामा नये. त्याचा अर्थव्यवस्थेशीही संबंध असतो. उदाहरणार्थ, अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते तेव्हा त्याला इतर अनेक कारणं असली, तरी त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे वाढती विषमता हे असतं. याचं कारण राष्ट्रीय उत्पन्न काही मूठभरांच्या हातात गेलं, तर देशात तयार होणारं उत्पादन खरेदी करण्याची क्षमता उरलेल्या बहुसंख्य गरीबांकडे नसते. मग माल पडून राहायला लागतो. वरचे श्रीमंत लोक किती टूथपेस्ट, साबण, मोटारगाड्या, मोबाईल आणि घरं घेणार? त्यामुळे उपभोगाच्या वस्तू (कंझ्युमर गुडस) पडून राहायला लागतात. आहे तोच माल खपत नाही म्हटल्यावर उद्योगपती नवीन कारखानेही काढत नाहीत, त्यामुळे यंत्रं, कारखाने आणि इतर कॅपिटल गुड्‌सची मागणी आणि त्यांचं उत्पादनही घटतं. या सगळ्यामुळे रोजगार घटतो. त्यामुळे पुन्हा लोकांची खरेदीक्षमता आणखीनच घटते. त्यामुळे बाजारात माल आणखी जास्त पडून राहायला लागतो. मग आणखी कारखाने बंद पडणं, कामगारकपात होणं हे चक्र सुरू होतं आणि यातून अर्थव्यवस्थेची मंदीकडे वाटचाल सुरू होते.

थोडक्‍यात एका मर्यादेपलीकडली विषमता लोकांकरता आणि एकूण अर्थव्यवस्थेच्या आरोग्यासाठी वाईटच. आपण ती आटोक्‍यात आणली नाही, तर आज नाही तरी काही वर्षांत मोठी मंदी येण्याची आणि त्याशिवाय लोकांच्या प्रक्षोभाचा उद्रेकही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही!

योगायोग (अच्युत गोडबोले)

‘यश’ या शब्दाचा अर्थ काय आणि मला मी खरोखरच यशस्वी का वाटत नाही, याची कारणं क्षणभर बाजूला ठेवली तरी मी जे काही आयुष्यात थोडंफार करू शकलो, ते खरोखरच माझ्या कर्तृत्वामुळं होतं की परिस्थितीमुळं? की योगायोगामुळं? इतरांच्या आयुष्यात घडणाऱ्या असंख्य प्रतिकूल गोष्टींपैकी एक किंवा कदाचित दोन जरी गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या असत्या, तरी मी जे काही आयुष्यात केलं, त्याच्या १०-२० टक्के तरी करू शकलो असतो का?


परवा रस्त्यावर मला एक चाहता-वाचक भेटला. आयआयटीत शिक्षण, सीईओसारख्या उच्च पदावरचा आयटी क्षेत्रातला २३ वर्षांचा अनुभव, त्यानंतरची इंग्लिश आणि मराठीतली तीसेक गाजलेली पुस्तकं याबद्दल तो भरभरून बोलत होता. ‘तुम्ही इतकं ‘यश’ कसं मिळवलं,’ असं त्यानं मला विचारलं. ‘यश’ या शब्दाचा अर्थ काय आणि मला मी खरोखरच यशस्वी का वाटत नाही, याची कारणं क्षणभर बाजूला ठेवली तरी मी जे काही आयुष्यात थोडंफार करू शकलो, ते खरोखरच माझ्या कर्तृत्वामुळं होतं की परिस्थितीमुळं? की योगायोगामुळं? यावर मी विचार करायला लागलो आणि आयुष्यातली अनेक वर्षांची पानं मी उलटून बघितली, तेव्हा मला माझ्या ‘कर्तृत्वा’चा फोलपणा दिसायला लागला.

मी कसा वाढलो? मी एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात वाढलो. मला किंवा माझ्या आई-वडिलांना रोज पाण्याच्या एकेका कळशीसाठी तीन-चार किलोमीटर चालत जावं लागलं नाही. सगळ्यात खालच्या जातीचा म्हणून शाळेतल्या वर्गात माझा कुणी दुःस्वास केला नाही. मी गव्हाळ रंगाचा असल्यामुळं वसाहतवादी वृत्तीतून आलेला गोऱ्या कातडीचा वृथा अभिमान बाळगणाऱ्यांकडून ‘काळा’ म्हणूनही माझी कुणी कुचेष्टा केली नाही. आज भारतातल्या कोट्यवधी लोकांना हे ‘भाग्य’ लाभत नाही.
मी झोपडपट्टीत वाढलो नाही. रात्रभर डासांनी मला भंडावून सोडलं नाही. आमच्याकडं वीज असल्यामुळं दिवे आणि पंखे नीट चालायचे. आम्हाला कंदिलात अभ्यास करावा लागला नाही किंवा उकाड्यानं कधी बेजार होऊन रात्री तळमळत काढाव्या लागल्या नाहीत. शेजारीपाजारी किंवा आमच्या घरी रोज कुणाची तरी दारू पिऊन भांडणं मला ऐकावी लागली नाहीत. समोरच पडलेल्या कचऱ्याचा घाणेरडा वास कधी आम्हाला आला नाही. घरासमोरच पावसाळ्यात तुडुंब वाहणारे नाले आणि गटारं आमच्या समोर नव्हती. त्यामुळं घरात कधीही कुबट वास आला नाही किंवा सतत घोंघावणाऱ्या माश्‍यांनी सतावलं नाही. वडिलांची मिळकत कमी पडते म्हणून मला शेतात गुरं राखायला जावं लागलं नाही...हॉटेलमध्ये कप-बश्‍या विसळाव्या लागल्या नाहीत...रेल्वेमध्ये खेळणी विकावी लागली नाहीत...घरोघर वर्तमानपत्रं टाकावी लागली नाहीत...कुणाकडं जाऊन घरकाम कराव लागलं नाही...आणि बालकामगार म्हणून अत्यंत गलिच्छ आणि कुबट कारखान्यात रोज १२-१४ तास कामही करावं लागलं नाही...आदिवासी आणि भटक्‍या-विमुक्तांचं आयुष्य माझ्या वाट्याला आलं नाही...आज भारतात कोट्यवधी लोकांच्या वाट्याला असं बालपण येत नाही.
मला घालायला भारी किमतीचे नसले तरी व्यवस्थित कपडे मिळाले. फाटके कपडे घालून येतो, म्हणून कुणी माझी चेष्टा केली नाही किंवा मला कपड्यांचे फक्त तेच दोन जोड रोज धुऊन घालावे लागले नाहीत. कधी अनवाणी चालत यावं लागलं नाही किंवा छत्री नाही म्हणून भिजतही घरी यावं लागलं नाही. मुख्य म्हणजे, मला खायला-प्यायला व्यवस्थित मिळालं आणि तेही पौष्टिक आणि सकस. त्यात डाळी, दूध, भाज्या भरपूर असल्यामुळं प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स असं सगळं व्यवस्थित मिळायचं. त्यामुळं मिळालाच तर फक्त एखादा वडापाव किंवा फेकून दिलेली शिळी भाकरी यावर पोट भरावं लागलं नाही. थोडक्‍यात माझं कुपोषण झालं नाही. आपल्या मेंदूची वाढ पहिल्या पाच वर्षांत होते असं म्हणतात. त्यामुळं माझ्या मेंदूची वाढ फार मोठी जरी झाली नसली, तरी जी काही झाली त्यात बाधा आली नाही. पूर्वीचं तर सोडाच, आजही ४०-५० टक्के भारतीय मुलांना हे शक्‍य होत नाहीय.

आमच्या घरी वातावरण सुरक्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत होतं. म्हणजे शिकणं ही आपोआपच होणारी नैसर्गिक गोष्ट होती. याउलट माझ्या लहानपणी ५० टक्के आणि आजही जिथं ३० टक्के लोक पूर्णपणे निरक्षर आहेत आणि पुढच्या ३०-४० टक्के लोकांना जेमतेम अक्षरं वाचता येतात किंवा जेमतेम प्राथमिक शिक्षण पूर्ण करता येतं आणि जिथं शिक्षणाची परंपराही नाही आणि ऐपतही नाही अशा कुटुंबांत शिक्षण घेणं हाच मुळी एक पराक्रम मानला जातो. तसा तो माझ्या बाबतीत मानला जाण्याचा प्रश्‍नच नव्हता.

शिवाय, आमचं घर लहान असलं तरी ते स्वतंत्र होतं. एकाच खोलीत दोन-तीन कुटुंबं राहत आहेत, रोज कॉमन संडासासाठी किंवा पाण्यासाठी एक-दोन तास थांबावं लागतंय, सतत घराबाहेर आणि घरात गोंगाट, भांडण, मारामाऱ्या आणि शिव्या ऐकायला मिळत आहेत, बाहेरून सतत कर्ण्यावर कुठल्याशा सिनेमाची गाणी कानठळ्या बसेपर्यंत ऐकू येत आहेत, बाहेर नाक्‍यावर बेकार तरुण गुटखा खात आणि सिगारेट किंवा चरस फुंकत चकाट्या पिटत बसलेले आहेत, शेजारच्या दारूच्या गुत्त्यापासून सतत वास येतोय आणि तिथल्या भांडणांचा, आरड्याओरड्याचा आणि शिवीगाळाचा त्रास होतोय, दारू आणि चरस पिणारे मित्र मिळाले आहेत, दर दुसऱ्या दिवशी गल्लीतल्या कुणाची तरी चौकशी पोलिस करत आहेत किंवा कुणाला तरी पकडून नेत आहेत, पाऊस पडला की पूर्ण झोपडी पाण्यानं भरल्यामुळं दिवस दिवस बाहेर राहावं लागतंय आणि नंतर भांड्यांनी पाणी बाहेर काढावं लागतंय, समोरच चाललेल्या वेश्‍याव्यवसायातल्या बायका रोज पान खाऊन रस्त्यावर थुंकत आहेत आणि अचकट-विचकट चाळे करून गिऱ्हाइकांना बोलावत आहेत...हे असले कसलेच अनुभव माझ्या वाट्याला आले नव्हते.

मी गरीब शेतकऱ्याच्या घरीही जन्मलो नव्हतो. एकतर पावसाच्या भरोशावर आपलं आयुष्य अधांतरी तरंगतंय असं मी बघितलेलं नव्हतं. आपण जे पिकवतो त्याला काही महिन्यांतच किती भाव मिळणार आहे, हे माहीत नसल्यामुळं येणारी असुरक्षितता मी अनुभवली नव्हती. आपल्या हातात नसलेल्या कारणांनी मालाचे भाव पूर्ण पडल्यामुळं माल रस्त्यावर फेकून द्यावा लागून आपणच रस्त्यावर येणार आहे, याची कल्पना नसणं एवढं बेभरवशाचं आयुष्य मी किंवा माझे वडील जगत नव्हतो. शेवटी कर्जबाजारी होऊन केवळ १०-२० रुपये परत करता न आल्यामुळं माझ्या वडिलांनी विष पिऊन किंवा झाडाला टांगून घेऊन आयुष्य संपवलं नव्हतं.

मला कोणताच मानसिक आजार झाला नव्हता आणि आमच्या कुटुंबातही कुणाला स्किझोफ्रेनिया किंवा गंभीर नैराश्‍य अशा तऱ्हेचे विकार झालेले नव्हते. अशा कुठल्याही आजारामुळं संपूर्ण कुटुंब जसं उद्‌ध्वस्त होतं, तसं काहीच माझ्या आयुष्यात घडलं नव्हतं. घरात कुणी आजारी पडलं तरी औषधाला किंवा डॉक्‍टरसाठी लागणारे पैसे आमच्याकडं होते. सगळे डॉक्‍टरही ओळखीचे असल्यामुळं पैसेही कमी पडायचे नाहीत किंवा वागणूकही चांगली मिळायची. औषधांकरता किंवा एखाद्या ऑपरेशनसाठी दागिने किंवा घर गहाण टाकण्याची वेळ आईवर कधी आली नाही किंवा हॉस्पिटलमध्ये तासन्‌तास रांगेत उभं राहावं लागलं नाही किंवा त्यांची हिडीसफिडीसही वाट्याला आली नाही. हॉस्पिटलमध्ये एखाद्या चाचणीसाठी कित्येक दिवस किंवा महिने थांबावं लागलं नाही, तिथं जमिनीवर झोपावं लागलं नाही, हार्ट ॲटॅक झालेल्या वडिलांना तीन-चार किलोमीटर हॉस्पिटलपर्यंत चालवत किंवा हातगाडीवर घेऊन जावं लागलं नाही किंवा ज्यातून वाचूच शकणार नाही अशा आजारातही, फक्त पुढचे काही दिवस जगता यावेत यासाठी त्या व्यक्तीनं काढलेलं कर्ज ती व्यक्ती मृत्युमुखी पडल्यावर सगळं आयुष्य आम्हाला फेडत बसावं लागलं नाही.

मी गरीब कुटुंबातली बाईमाणूसही नव्हतो. अनेक पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा मला सहन कराव्या लागल्या नाहीत; ना बलात्कार, हुंडाबळी किंवा ऑनर किलिंग यांना मला बळी पडावं लागलं ना कुठल्याही खाप पंचायतीसमोर मला जावं लागलं. माझ्यावर कुणी ॲसिड फेकलं नाही की माझी कुणी छेडही काढली नाही. आमच्या घराशेजारीच शौचालय असल्यामुळं बाहेर उघड्यावर बसण्याची काही वेळ आली नाही. मारामाऱ्या, लूटमार, बलात्कार, छेडछाड, अपमान अशा गोष्टींना मला सामोरं जावं लागलं नाही. त्यामुळं मी सतत भीतीच्या छायेत आणि दडपणाखाली वाढलो नाही. आई-वडिलांना मी ‘नकोशी’ झालो नाही.

दंगलीमध्ये किंवा ‘धर्म किंवा जात’युद्धामध्ये हजारो लोक मारले गेले आणि लाखो बेघर झाले. जगात तर कोट्यवधी. त्यात मी कधी सापडलो नाही किंवा माझ्या समोर शेकडो निरपराध लोकांना मरतानाही मला बघावं लागलं नाही, मी निर्वासितासारखा राहिलो नाही आणि कामाच्या शोधात माझ्या आई-वडिलांना एका ठिकाणाहून दुसरीकडं सतत फिरावं लागलं नाही किंवा शहरामध्ये नाक्‍यानाक्‍यावर कुठल्याशा बिल्डिंगमध्ये काम मिळतंय का यासाठी तासन्‌तास उभं राहावं लागलं नाही, तसंच कुठल्याशा अनोळखी गावात कुठल्याही अनोळखी बिल्डिंगसाठी विटा उचलायचं कामही त्यांना करावं लागलं नाही.

ेएकूण काय तर, मी जेव्हा मागं वळून पाहतो, तेव्हा प्रश्‍न पडतो की मी जे काही तथाकथित ‘यश’ मिळवलं, ते खरंच माझं होतं की परिस्थितीचं? वर सांगितलेल्यांपैकी एक किंवा कदाचित दोन गोष्टी जरी माझ्या आयुष्यात घडल्या असत्या, तरी मी जे काही आयुष्यात केलं, त्याच्या १०-२० टक्के तरी करू शकलो असतो का?
आयुष्यातली ही रेस मी ‘वनसायडेड’च लढत होतो. मला इतर ७०-८० टक्के लोकांपेक्षा थोड्याथोडक्‍या नव्हे तर प्रचंडच प्रमाणात ‘लीड’ मिळाला होता आणि मग ‘ही शर्यत मी स्वकर्तृत्वावर जिंकली’ असल्याचं सांगत मी फिरत होतो. मलाच यातला माझा पोकळ युक्तिवाद लक्षात येत होता. अशीच प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असतानाही जे ‘यशस्वी’ होतात, त्यांचं कौतुक झालंच पाहिजे; पण एकदा त्यांचं कौतुक केलं, त्यांना पारितोषिकं दिली की मग ज्यामुळं त्यांना हा संघर्ष करावा लागला, ती भीषण परिस्थिती बदलण्याची जबाबदारी झटकता येते, हा आपल्या समाजाचा ढोंगीपणाही माझ्या लक्षात आला.

मला असं वाटतं, की सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या बाबतीत समान करता येणं अशक्‍य आहे; पण निदान ही शर्यत एकाच पातळीवरून तरी सुरू व्हायला नको का?
त्यामुळंच प्रत्येकाला अन्न-धान्य, कपडे, पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, घरं, शौचालयं, करमणूक, प्रवास या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजेत. नाहीतर गेल्या अनेक शतकांपासून/दशकांपासून सुरू असलेली ही अन्यायपूर्वक शर्यत आपण पुढंही लढवत बसू आणि स्वतःच्या ‘यशा’बद्दल आणि ‘कर्तृत्वा’बद्दल स्वतःचीच पाठ थोपटत बसू!

अमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)

अमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी दूर न होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, तिथल्या प्रगतीची फळं फक्त वरच्याच श्रीमंत वर्गाला मिळाली आणि त्यामुळे विषमता वाढली. तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढली; पण या वाढीमुळे जो फायदा झाला, तो खालपर्यंत पोचलाच नाही.


अमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. हॉलिवूडचे सिनेमे, अमेरिकी कांदबऱ्या, अमेरिकेत स्थायिक झालेले अनेक यशस्वी भारतीय, अधूनमधून त्यांना भेटायला जाणारे आई-वडील आणि पर्यटक या सगळ्यांनी आपल्यासमोर अमेरिकेची एक प्रतिमा उभी केलेली असते. ती म्हणजे, तिथले नागरिक आलिशान मोटारगाड्यांमधून फिरतात; गगनचुंबी इमारतींमध्ये किंवा स्वतःच्या बंगल्यात राजेशाही थाटात राहतात; भव्य शॉपिंग मॉल्समध्ये शॉपिंग करतात; तिथं सुंदर, मोठे विमानतळ आहेत, सहा-आठ पदरी चांगले महामार्ग आहेत, खाण्या-पिण्याची रेलचेल असलेली मोठमोठी रेस्टॉरंट्‌स आहेत आणि मुख्य म्हणजे तिथं गरिबी मुळीच नाही, तिथल्या रस्त्यांवर एकही भिकारी आपल्याला दिसत नाही...वगैरे वगैरे. थोडक्‍यात, अमेरिकी नागरिक प्रचंड सुबत्तेत राहतात, असं एकंदरीत चित्र आपल्या मनात असतं. तिथला मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग आणि श्रीमंतवर्ग या वर्गाविषयी बोलायचं झालं तर हे चित्र बऱ्यापैकी खरंच आहे; पण हे चित्र सगळ्या अमेरिकी नागरिकांबाबत खरं आहे का? हे बघायला गेलं तर एक वेगळं वास्तव समोर येतं.

अमेरिकेत प्रचंड विषमता तर आहेच आणि दारिद्य्रही आहे. अमेरिकी सरकार एका व्यक्तीला आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 12 हजार 140 डॉलर्स, दोन व्यक्तीच्या कुटुंबाला 16 हजार 460 डॉलर्स आणि आठ जणांच्या कुटुंबासाठी 42 हजार 380 डॉलर्स इतकं उत्पन्न कमीत कमी लागेल असं सांगतं. थोडक्‍यात, यापेक्षा कमी उत्पन्न मिळवणारे हे गरीब असा हिशेब ते करतं. (आम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरसुद्धा वर्षाला 60 हजार - 70 हजार डॉलर्स या पगारावर अमेरिकेला पाठवायचो!).

अमेरिकेतल्या या दारिद्य्ररेषेच्या व्याख्येनुसार, आजही अमेरिकेत 4.65 कोटी लोक म्हणजे अमेरिकेतल्या संपूर्ण लोकसंख्येच्या तब्बल 14.23 टक्के लोक दारिद्य्ररेषेखाली जगतात. फिलिप ऍल्स्टॉन या युनायटेड नेशन्समधल्या एका पत्रकारानं सन 2016 मध्ये अमेरिकेत केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतली जवळजवळ 18 टक्के मुलं दारिद्य्ररेषेखाली जगत होती. मिसिसिपी आणि न्यू मेक्‍सिको इथली जवळपास 30 टक्के मुलं, तर लुइझियानामध्ये 29 टक्के मुलं दारिद्य्ररेखाली जगत होती.

"दारिद्य्ररेषेखालचे' किंवा "गरीब' या सदराखाली मोडत असलेल्या या लोकांपैकी सगळेच बेकार असतात असं नाही. उलट, या गरिबांमध्ये अनेक जण पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ नोकरी करणारे आहेत. याचं कारण कित्येकांच्या एका नोकरीतल्या पगारातून रोजच्या गरजाही नीटशा भागत नाहीत. मग आहे त्या नोकरीचे तास संपवून उरलेल्या वेळात रेस्टॉरंटमध्ये वेटरचं काम करायला किंवा एखाद्या मॉलमध्ये छोटं-मोठं काम करायलाही ही मंडळी तयार असतात. तरीही त्यांना आपल्या कुटुंबाचा खर्च पुरवता पुरवता नाकी नऊ येतात. कामाच्या ठिकाणी कुठल्याही सोई-सुविधा नसल्या तरीही हे लोक कितीही तास काम करायला तयार असतात. यामागचं मुख्य कारण, कोणत्याही क्षणी त्यांची नोकरी जाऊ शकते आणि मग दुसरी नोकरी मिळेल की नाही, याची त्यांना खात्रीच नसते.

"ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्‍स'नुसार अशा "वर्किंग पुअर' म्हणजे "नोकरी असूनही गरीब' असणाऱ्यांची संख्या सन 2016 मध्ये तब्बल 86 लाख इतकी होती. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

सन 2001 मध्ये प्रकाशित झालेल्या "निकेल अँड डाईम्ड्‌ ः ऑन (नॉट) गेटिंग बाय इन अमेरिका' या पुस्तकातून बार्बरा एहनरिच यांनी या वर्किंग पुअर मंडळींचं अतिशय विदारक वास्तव समोर आणलं आहे. नोकरी असूनही राहायला घर परवडत नाही म्हणून ही मंडळी एखाद्या स्वस्त मोटेलची (लॉज) एखादी खोली आठवडे तत्त्वावर भाड्यानं घेऊन राहतात किंवा तेही परवडणारं नसेल तर कारमध्येही राहतात आणि नूडल्स किंवा तत्सम स्वस्तात मिळणारे पदार्थ खाऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करतात. काही सरकारी तसंच खासगी संस्था या लोकांना अन्न वाटण्यासाठी ब्लड बॅंकसारखीच फूड बॅंक चालवतात. या बॅंकेपुढच्या रांगेत उशिरा गेलो तर अन्न संपून जाईल या भीतीनं सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. दरवर्षी अमेरिकेत जवळपास 4.6 कोटी लोक याचा फायदा घेत आहेत!

कॅथरिन जे. एडिन आणि ल्युक शेफर (Kathryn Edin and Luke Shaefer) यांनी लिहिलेल्या "डॉलर 2 ए डेः लिव्हिंग ऑन ऑलमोस्ट नथिंग इन अमेरिका' या नावाच्या पुस्तकात "अल्ट्रा पुअर' म्हणजेच दोन डॉलरपेक्षाही कमी उत्पन्न असलेल्यांचा आकडा दिला आहे. सन 1996 मध्ये अमेरिकेतले तब्बल 15 लाख लोक अल्ट्रा पुअर होते! त्यानंतर यात दुपटीनं वाढ झाली आहे. जागतिक बॅंकेच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आज 32 लोक दरडोई दररोज 1.9 डॉलर्सच्या (म्हणजे दरडोई दरवर्षी फक्त 614 डॉलर्सच्या किंवा चार जणांच्या कुटुंबासाठी दरवर्षी फक्त दोन हजार 773 डॉलर्सच्या) किंवा त्याच्याही खालच्या मिळकतीत जगतात.

फिलिप ऍल्स्टॉन यांच्या अलीकडच्या सर्वेक्षणानुसार, चार कोटी लोक गरिबीत, तर 1.85 कोटी लोक पराकोटीच्या गरिबीत राहतात. (यावरूनच युनायटेड नेशन्स आणि ट्रम्प यांच्यात वादावादी सुरू आहे). हे जवळपास अशक्‍यच आहे; पण मग फूड स्टॅम्प्स, थंडीसाठी मुलांना कपडे अशा इतर ज्या काही थोड्याफार कल्याणकारी सरकारी योजना अजूनही टिकून आहेत, त्यामुळे त्यांना जिवंत तरी राहता येतं आणि रस्त्यावर भीक मागावी लागत नाही. मात्र, तरीही ही प्रचंडच भयानक परिस्थिती आहे!
अमेरिकेत गरिबी दूर न होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथल्या प्रगतीची फळं फक्त वरच्याच श्रीमंत वर्गाला मिळाली आणि त्यामुळे विषमता वाढली. तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढली; पण या वाढीमुळे जो फायदा झाला, तो खालपर्यंत पोचलाच नाही. पुलित्झर पारितोषिक विजेते हेड्रिक स्मिथ यांनी याविषयी "हू स्टोल द अमेरिकन ड्रीम?' या नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आहे. त्यात लिहिल्यानुसार, सन 1973 ते 2011 या रीगनॉमिक्‍सच्या काळात अमेरिकी कामगारांची उत्पादकता 80 टक्‍क्‍यांनी वाढली; पण त्याच काळात कामगारांचे पगार फक्त 10 टक्‍क्‍यांनी वाढले! सन 1973 पासून आजपर्यंत तळाच्या 50 टक्के लोकांची खरी मिळकत (महागाई वजा करता) स्थिर राहिली किंवा चक्क खालावली! याउलट "ऑक्‍सफॅम'चे कार्यकारी संचालक विनी ब्यान्यिमा यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत सन 2017 मध्ये जी संपत्ती निर्माण झाली, त्यातली 82 टक्के फक्त वरच्या एक टक्‍क्‍यांना मिळाली.
अलीकडंच "ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूट'नं केलेल्या अभ्यासानुसार, श्रीमंत अमेरिकी नागरिकांचं आयुष्यमान सरासरी 90 वर्षं, तर गरीब अमेरिकी नागरिकांचं आयुष्यमान सरासरी 79 वर्षं आहे. असाच फरक शिक्षण, आरोग्य, कर्जबाजारीपणा, बेघर असणं आणि इतरही सगळ्या बाबतींत प्रकर्षानं दिसून येतो. थोडक्‍यात, तिथले नागरिक "दोन अमेरिकां'मध्ये राहतात. फक्त एका अमेरिकेला दुसरी अमेरिका दिसतच नाही. सगळी माध्यमं ही चित्रपट आणि इतर गोष्टींवरच्या वर्गाच्या प्रभावाखाली असल्यामुळे तिथं जाणाऱ्या कुणालाही ही दुसरी अमेरिका दिसतच नाही.

इंग्लंडनंही रीगन यांच्यासारखंच निओलिबरल धोरण स्वीकारल्यामुळं मार्गारेट थॅचर यांच्या कारकीर्दीपासून विषमता आणि गरिबी खूप वाढली. ज्या घरांमध्ये अन्न, वस्त्रं आणि पुरेशी उबदार घरं या तीन किंवा अधिक मूलभूत गरजा भागवल्या जात नाहीत, अशा कुटुंबांना इंग्लंडमध्ये गरीब म्हटलं जातं. अशा कुटुंबांचं प्रमाण सन 1980 च्या दशकात 14 टक्के होतं ते 2014 मध्ये दुपटीपेक्षा वाढून 33 टक्के झालं, असं 18 जून 2014 च्या "गार्डियन'मध्ये म्हटलं होतं. निओलिबरॅलिझम ही एक "फेल्ड्‌ सिस्टिम' आहे, यात आता वादच नाही; पण एवढं असूनही आहे ती निओलिबरल, मुक्त बाजारपेठेची व्यवस्थाच कशी चांगली आहे, ती कशी देवाचीच देणगी आहे, तिला कसा पर्याय नाही (देअर इज नो अल्टरनेटिव्ह-टिना) याविषयीचं आणि जीडीपीच्या आणि शेअरमार्केटच्या वाढीबद्दल रात्रंदिवस चर्चा करण्यात अमेरिकेतले आणि (भारतात तर गरिबी/ बेकारीची आकडेवारी भीषण असूनही) भारतातलेही अनेक विचारवंत मग्न आहेत.

याउलट युरोप आणि अमेरिका इथं काही विचारवंतांमध्ये या निओलिबरल पद्धतीपेक्षा वेगळी समाज-अर्थरचना शक्‍य आहे का आणि त्यासाठी समतेवर (निदान समान संधीवर) आधारलेल्या, पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास करणाऱ्या (सस्टेनेबल) मूठभरांऐवजी सगळ्यांच्या विकासावर आणि सुख-समाधानावर भर देणाऱ्या पर्यायी विकासनीतीची मॉडेल्स उभी करता येतील का यावर आज विचार सुरू आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंडच्या "पॉलिटिकल इकॉनॉमी'चे प्राध्यापक गर अल्पेरोटिझ्‌ (Gar Alperoritz) यांनी याविषयी "व्हॉट देन मस्ट वुई डू' हे सुंदर पुस्तक लिहिलं आहे. सन 2013 मध्ये 20 हजार सभासद असलेल्या "ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेंट' या संस्थेनं अशा पर्यायी व्यवस्थेविषयी बोलायला त्यांना आमंत्रित केलं होतं. पर्यायी समाज-अर्थव्यवस्थेविषयी विचार करणारे अल्पेरोरिटझ्‌ हे काही एकटेच नव्हेत. युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्‌समधले प्राध्यापक रिचर्ड वूल्फ हेही अशा अनेकांपैकी एक आहेत. ही संख्या वाढतच चालली आहे.

विषमता कमी करण्यासाठी एका मर्यादेपलीकडं उत्पन्न असल्यास प्राप्तिकर वाढवणं, "वेल्थ आणि इनहेरिटन्स टॅक्‍स' वाढवणं आणि सरकारी कल्याणकारी योजना वाढवणं असे अनेक मार्ग "कॅपिटल'चे लेखक थॉमस पिकेटीच नव्हे, तर स्वतः बिल गेट्‌स आणि वॉरन बफे हेही सुचवत आहेत. मात्र, याउलट लोकशाहीवर आधारलेल्या आणि खऱ्या अर्थानं लोकाभिमुख अशा कामगारांनी नियंत्रित केलेल्या; पण बाजारपेठेत स्पर्धा करणाऱ्या कॉर्पोरेशन्सची कल्पना कित्येक विचारवंतांनी मांडली आहे. आज जगात सहकारावर आधारलेल्या मोठ्या आणि यशस्वी अशा कित्येक अब्ज उलाढाल असणाऱ्या कॉर्पोरेशन्सची संख्या वाढत आहे, याकडं ते लक्ष वेधत आहेत. याशिवायही इतर अनेक मॉडेल्स उभी राहत आहेत.

यातला कुठला मार्ग योग्य आहे, हे विचाराअंती पुढं येईलच; पण "गरिबी, विषमता, पर्यावरणाचा ऱ्हास, बेकारी हे प्रश्‍नच नाहीयेत, आहे ते ठीकच चाललंय, काहीच करायची गरज नाही' अशी भूमिका अनेक प्रस्थापित विचारवंत घेतात आणि त्यामुळे याविषयी जेवढी गंभीर चर्चा तातडीनं सगळ्या माध्यमांतून व्हायला पाहिजे ती होतच नाही. त्याऐवजी "हे नेतृत्व की ते नेतृत्व' यासंदर्भातल्या त्याच त्या चर्चा, सिनेमा, मालिका, वेगवेगळे गैरव्यवहार, क्रिकेट, जाहिराती, फॅशन शोज्‌, स्टार-सेलिब्रिटींची लग्नं, सेलिब्रिटींचे मृत्यू आणि मीडिया ट्रायल्स यांच्यातच सगळी माध्यम इतकी गर्क आहेत की सर्वसामान्य माणसानं करायचं काय?

सतत बदला, नाही तर नष्ट व्हा !

आयटी, बीटी आणि एनटी या तीन ‘टी’मुळे तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा आणि त्याअनुषंगानं जगण्याचा वेग महाप्रचंड होत चालला आहे. त्या प्रगतीचा वेग स्वीकारणं आणि त्यानुसार स्वतः बदलत राहून पुढं पुढं जात राहणं, हे एक मोठंच आव्हान यापुढच्या काळात माणसासमोर असणार आहे. अर्थात, हे सगळे बदल व्हायला काही वर्षं किंवा काही दशकं जातील; पण यातल्या बऱ्याच गोष्टी या शतकात होतील, यात मात्र शंकाच नाही. नष्ट व्हायचं नसेल तर सतत बदलत राहावं लागणार आहे. त्याविना तग धरताच येणार नाही.



डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे आताचं हे शतक तीन ‘टी’मुळे गाजणार आहे. इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी (आयटी), बायोटेक्‍नॉलॉजी (बीटी) आणि नॅनोटेक्‍नॉलॉजी (एनटी). आता तर तंत्रज्ञानाची ही प्रगती इतक्‍या जलद गतीनं होतेय, की तिचा आपल्या आयुष्यावर, व्यवसायावर, नोकऱ्यांवर आणि कामाच्या पद्धतींवर प्रचंड परिणाम होणार आहे. त्यासाठी तयार राहणं, त्या प्रगतीचा वेग स्वीकारणं, त्याप्रमाणे स्वतः बदलून पुढं जाणं हे सगळ्यात मोठं आव्हान राहणार आहे.

तंत्रज्ञानातल्या प्रचंड वेगानं होणाऱ्या प्रगतीमुळं अनेक जुनी कौशल्यं कालबाह्य झाली आणि नवीन कौशल्यांची मागणी वाढली. अनेक व्यवसाय पूर्णपणे नष्ट झाले किंवा त्यांचं स्वरूप बदललं. पूर्वीच्या टायपिस्ट मंडळींना आता वर्ड प्रोसेसिंग किंवा डीटीपी शिकावं लागलं. जुन्या ड्राफ्ट्‌समनना कॅड कॅम शिकावं लागलं, एटीएम आल्यानंतर बॅंकेतल्या टेलर क्‍लार्कची गरज राहिली नाही. उद्या चालकाशिवाय चालणाऱ्या मोटारगाड्या आल्या की लाखो चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल. ई-मेलनंतर टपाल-कार्यालयांचं स्वरूप बदललं. उद्याच्या जगात रोबोच घरातली आणि इतर कामं करायला लागले तर माळी, वेटर, रंगारी, घरगडी अशा अनेकांची कामं जाण्याचा मोठा धोका आहे. व्हेंडिंग मशिन वापरल्यामुळं रेल्वे आणि तत्सम तिकीट-खिडकीवर काम करणाऱ्या सगळ्यांचे रोजगार जात आहेत. पूर्वी ॲनिमेशन फिल्मसाठी अनेक चित्रं काढावी लागायची. आता ॲनिमेशनचं सॉफ्टवेअर आल्यावर या क्षेत्रातले अनेक चित्रकार बेरोजगार झाले. कॅमेऱ्याचा शोध लागल्यावर पोर्ट्रेट करणाऱ्या अनेक चित्रकारांची गरजच उरली नाही. कित्येक चित्रकार तर फोटोग्राफर बनले. ‘यूज अँड थ्रो’ संस्कृतीमुळं अनेक नित्योपयोगी वस्तूंविषयीच्या व्यवसायांचं स्वरूप बदललं. हे असं सगळ्या क्षेत्रांत झालं. थोडक्‍यात, या सगळ्यांना काहीतरी नवीन कौशल्यं शिकावी लागली. जे शिकले नसतील, त्यांना बेरोजगार व्हावं लागलं. जुन्याचं अनलर्निंग आणि नव्याचं लर्निंग हे सतत सुरू झालं आणि त्याचा वेग प्रचंड वाढला. यापुढं तर तो आणखीच वाढणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळं पुढच्या पिढीच्या आयुष्यात सरासरी सहा-सात वेळा कामाची पद्धत बदलेल, इतका हा झपाटा असणार आहे, असं काही समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे ज्यांना जमेल तेच पुढच्या काळात तग धरतील. या बदलांना जे उद्योग सामोरे जातील, तेच उद्याच्या जगात टिकतील.

कारखान्यातही अशिक्षित कामगारांऐवजी रोबो आणि स्वयंचलित यंत्रं यांचाच वापर जास्त व्हायला लागला आहे; त्यामुळं नवीन कामगारांना ही यंत्रं कशी चालवायची हे शिकून घ्यावं लागलं, आजही शिकावं लागतंय. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंगमध्येही कोडिंग, टेस्टिंगसारखी अनेक कामं ऑटोमेट झाल्यामुळं नष्ट होत आहेत आणि होतच राहतील. ऑटोमेटेड टेलिफोन सिस्टिममुळं टेलिफोन ऑपरेटरची गरज कमी होत चालली आहे किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप बदलत चाललं आहे. नॅनोटेक्‍नॉलॉजीमुळं आणि थ्री-डी प्रिंटिंगमुळं तर उत्पादनप्रक्रियेत आणि त्यामुळं कामाच्या स्वरूपात प्रचंड बदल होतील.

डिजिटल टेक्‍नॉलॉजीमुळं पैसा, पुस्तकं, वाचनालयं, वर्तमानपत्रं, उत्पादन, वितरण, शिक्षण, आरोग्य, प्रवास, करमणूक, जाहिराती आणि सिनेमे अशा असंख्य गोष्टी आमूलाग्र बदलतील. उदाहरणार्थ ः नाणी, नोटा, डेबिट-क्रेडिट कार्ड, चेक या गोष्टी कालबाह्य होतील आणि सगळे व्यवहार मोबाईल फोनमधून डिजिटल स्वरूपातच होतील. आजही ‘पेटीएम’ किंवा ‘भीम’ हेच करत आहेत. उद्याच्या जगात सिनेमेही ॲनिमेशन वापरून आपल्या घरी बसून काढता येतील, असं काहींचं भाकीत आहे आणि त्यात गंमत म्हणजे, आपल्याला कुठलाही हीरो आणि कुठलीही हिरॉईन निवडता येईल. अगदी जिवंत किंवा मृत! तसं झालं तर आज अनेक सेट डिझायनर, कॉस्च्युम डिझायनर, मेकअप्‌ ऑर्टिस्ट, अनेक कर्मचारी, एवढंच नव्हे तर, अगदी अभिनेते-अभिनेत्री यांचीही कामं जातील किंवा त्यांच्या कामाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल होईल!

जे माणसांच्या बाबतीत झालं, तेच उद्योगांच्या बाबतीतही झालं आणि होत आहे. तंत्रज्ञानामुळं कित्येक कौशल्यं, लहान-मोठे उद्योग आणि कंपन्या यांच्यावर प्रचंड परिणाम होत आहे आणि तो प्रचंड वेगानं होत आहे. जे उद्योग नवीन तंत्रज्ञान स्वीकारू शकले नाहीत आणि जुन्यालाच चिकटून बसले, ते उद्योग आणि त्या त्या कंपन्या कालबाह्य झाल्या किंवा त्यांची प्रगती खुंटली. याची अनेक उदाहरणं देता येतील. स्पेरी युनिव्हॅक, हनिवेल, कंट्रोल डेटा, डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन, वॅंग, डेटा जनरल, प्राईम या मेनफ्रेम किंवा मिनिकॉम्प्युटर बनवणाऱ्या कंपन्या, कोडॅक, पोलरॉईड, ल्यूसंट, नॉर्टेल, कॉम्पॅक, गेटवे, लोटस, ॲशटन टेट, बोरलॅंड, नोव्हेल, नोकिया, टॉवर रेकोर्डज्‌, बोर्डर्स, झेरॉक्‍स, बार्न्स अँड नोबल, याहू, सन मायक्रोसिस्टिम्स, सियर्स, डेल, मोटोरोलाचे आणि सोनीचे मोबाईल फोन आणि ब्लॉकबस्टर अशा वेगवेगळ्या कंपन्या ही त्यातली काही महत्त्वाची नावं आहेत. खरं तर यातल्या कित्येकांना नवीन तंत्रज्ञानाची चाहूल लागली होती; पण एकतर ते गाफील तरी राहिले किंवा स्वतःत चटकन बदल घडवून आणण्यात ते अयशस्वी तरी ठरले.

एकेकाळी फोटोग्राफीच्या उद्योगात कोडॅकची जवळपास मक्तेदारीच होती. कोडॅकचा पारंपरिक उद्योग हा ॲनेलॉग तंत्रज्ञानावर अवलंबून होता. कोडॅकला डिजिटल टेक्‍नॉलॉजीविषयी नक्कीच माहीत होतं; पण तरीही कोडॅक जुन्या ॲनेलॉग तंत्रज्ञानालाच चिकटून राहिली. याच डिजिटल टेक्‍नॉलॉजीचा वापर जपानच्या फुजी फिल्मसारख्या प्रतिस्पर्ध्यांनी केला आणि कोडॅक प्रचंड मागं पडली. सन १९९६ मध्ये कोडॅकची विक्री एक ६०० कोटी डॉलर, तर नफा २५० कोटी डॉलर होता, तर सन २०१२ मध्ये त्यांना २२.२ कोटी डॉलरचा तोटा झाला होता!

नोकियाची घसरण तर आता जगप्रसिद्धच आहे. एकेकाळी मोबाईलच्या दुनियेत राज्य करणाऱ्या नोकियाचं आता नावही ऐकू येत नाही. सन २००७ मध्ये सगळ्या जगात विकल्या गेलेल्या हॅंडसेटपैकी ४० टक्के हॅंडसेट नोकियाचे होते. त्या वेळी त्या कंपनीची बाजारातली किंमत १५० बिलियन म्हणजेच १५ हजार कोटी डॉलर म्हणजे साधारणपणे १० लाख कोटी रुपये होती; पण नवीन तंत्रज्ञान न स्वीकारल्यामुळं कंपनीची घसरण जी सुरू झाली ती थांबेचना. शेवटी मायक्रोसॉफ्टनं ती कंपनी कवडीमोलाला विकत घेतली!

कॅनडातल्या ‘रिसर्च इन मोशन’ (RIM) या कंपनीनं सन २००३ मध्ये ‘ब्लॅकबेरी’ हा मोबाईल फोन काढला. ई-मेल पाठवण्याची सोय ब्लॅकबेरीमध्ये असल्यामुळं त्यांची तुफान विक्री झाली. सन २००८ मध्ये कंपनीची व्हॅल्यू (मार्केट कॅप) ७० बिलियन डॉलर म्हणजेच सात हजार कोटी डॉलर झाली; पण नंतर ब्लॅकबेरी हा फोन नवीन अँड्रॉईड स्मार्ट फोनपुढं टिकू शकला नाही आणि त्याचा ऱ्हास सुरू झाला. काहीच काळात ब्लॅकबेरीला एक बिलियन डॉलर म्हणजेच १०० कोटी डॉलरचा तोटा झाला! त्यांच्याकडं न विकल्या गेलेल्या ९३ कोटी हॅंडसेटचा साठा पडून होता. शेवटी टोरेंटोच्याच फेअरफॅक्‍स फायनान्शियल या कंपनीनं ही कंपनी विकत घेतली!

अमेरिकेतल्या ‘ब्लॉकबस्टर्स’ या कंपनीची दर शहरात अनेक मोठी व्हिडिओ स्टोअर होती. ब्लॉकबस्टर्स ग्राहकांना व्हीसीडी आणि डीव्हीडी भाड्यानं देत असे; पण त्यानंतर नेटफ्लिक्‍स नावाच्या कंपनीनं ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ ही सेवा ‘मेल’द्वारे सुरू केली. रेडबॉक्‍स कंपनीनं तर डीव्हीडी एक डॉलर किमतीला व्हेंडिंग मशिनद्वारे भाड्यानं द्यायला सुरुवात केली. आता तर इंटरनेट, यू-ट्यूब आणि इतर अनेक माध्यमांतून अनेक व्हिडीओ पाठवता/ बघता येतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्लॉकबस्टर्सचा मूळ उद्योग तर कोसळलाच आणि त्यांची दर महिन्याला शेकडो दुकानं चक्क बंद पडायला लागली...आणि कर्जात बुडून गेली!

ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून पुस्तकं घरपोच आणि शिवाय स्वस्त मिळायला लागल्यापासून अमेरिकेतल्या बोर्डर्स किंवा बार्नस अँड नोबल या मोठ्या पुस्तकविक्रेत्या कंपन्या रसातळाला जायला लागल्या. लंडनचं एकेकाळचं ‘फॉईल्स’ हे पुस्तकांचं सुप्रसिद्ध दुकानही बंद पडलं. याच प्रकारे जगातली पुस्तकांची अनेक दुकानं बंद पडायला लागली. हे आजही सुरूच आहे. उद्याच्या जगात वर्तमानपत्रं आणि पुस्तकं ही सगळी डिजिटल झाल्यावर कागद, वर्तमानपत्रं/पुस्तकं यांची छपाई आणि त्यांचं वितरण या सगळ्या गोष्टी आमूलाग्र बदलतील किंवा नष्ट होतील! उद्याच्या जगात बॅंका, इन्शुरन्स, स्टॉक मार्केट आणि असंख्य कंपन्या यांची बरीचशी कार्यालयं ही ‘म्युझियम्स’ बनतील; कारण बरेचसे व्यवहार घरी बसूनच करता येतील.
रेल्वेची आणि विमानाची तिकिटं किंवा हॉटेल इंटरनेटवर थेट बुक करणं शक्‍य असल्यामुळं तर अनेक ट्रॅव्हल एजन्सी बंद पडल्या. फक्त ज्या ट्रॅव्हल कंपन्यांनी देशात आणि विदेशांत सहली काढून काही ‘व्हॅल्यू ॲड’ करायला सुरुवात केली, तेवढ्याच शिल्लक राहिल्या. ‘ओला’ किंवा ‘उबेर’ आल्यापासून पारंपरिक रिक्षा किंवा टॅक्‍सीचा उद्योग धोक्‍यात आला. त्यांनी स्वतःला बदललं नाही, तर त्यांच भवितव्य काय असेल, हे सांगायची आवश्‍यकता नाही. काही दशकांतच ‘ड्रायव्हरलेस’ मोटारगाड्या आल्यावर चालकमंडळींच्या नोकऱ्या नष्ट होतील किंवा बदलतील. शिक्षणामध्येही ई-लर्निंग आणि ‘कॉम्प्युटर-असिस्टेड लर्निंग’मुळं शिक्षकांचं काम हे प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष शिकवण्याऐवजी फॅसिलिटेटरचं राहील.

अनेक कंपन्यांची बिझनेस मॉडेल आता प्रचंड झपाट्यानं बदलत आहेत. ‘अलिबाबा’ ही रिटेल क्षेत्रातली एक प्रचंड मोठी कंपनी असली तरी दुकानं किंवा विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू यातलं त्यांच्या मालकीचं काहीच नाहीय! ‘एअरबब’ कंपनी लोकांना घरं किंवा जागा विकते; पण त्यांच्या मालकीची ती घरं किंवा त्या जागा नसतातच! ‘उबेर’ ही जगातली टॅक्‍सीसेवा देणारी खूप मोठी कंपनी असली, तरी त्यांच्या मालकीची एकही टॅक्‍सी नाही! या सगळ्या कंपन्या विक्रेता आणि ग्राहक यांच्यातला ‘फक्त एक दुवा’ बनून काम करतात आणि त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर हेच त्यांचं बलस्थान असतं.
या सगळ्या उलथापालथीत अनेक कंपन्या बंद पडतील आणि कित्येक कंपन्या इतर बड्या कंपन्यांकडून गिळंकृत केल्या जातील. सन १९५८ मध्ये कुठल्याही कंपनीचं सरासरी आयुष्य ६१ वर्षं होतं. तेच आता या सगळ्यामुळं केवळ २० वर्षं झालं आहे!
अर्थात हे सगळे बदल व्हायला काही वर्षं किंवा काही दशकं जातील; पण या शतकात यातल्या बऱ्याच गोष्टी होतील, यात मात्र शंकाच नाही. कुठल्याही माणसाला शिकताना किंवा उद्योग सुरू करताना ‘या उद्योगाचं उद्या काय स्वरूप असेल,’ याविषयी अगदी शतकाचा नसला तरी पुढच्या काही वर्षांचा किंवा एक-दोन दशकांचा विचार तरी नक्कीच करावा लागतो. त्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाकडं, स्पर्धेकडं आणि बदलत्या सामाजिक गरजांकडं सतत लक्ष घेऊन आपल्या व्यूहरचनेत (स्ट्रॅटेजी) सतत बदल करण्याची तयारी दाखवली पाहिजे. नाहीतर विनाश नक्कीच आहे!

Sacha mitra essay in hindi

sacha mitra essay in hindi
sacha mitra essay in hindi
sacha mitra essay in hindi
few lines on sacha mitra
sacha mitra story in hindi
essay on sacchi mitrata in hindi
poem on sacha mitra in hindi
sache mitra ki pehchan in hindi
mera priya mitra essay in hindi for class 3
my best friend essay in hindi for class 2
mera priya mitra essay in hindi for class 4
satya mitra
sacchi mitrata par kahani
sacchi mitrata par nibandh
sacchi mitrata par dohe in hindi
qualities of a good friend essay in hindi
sacchi mitrata in hindi
hindi elocution sacha mitra
story on sacchi mitrata in hindi
sacha mitra par kavita
nibandh on sacha mitra of class 3
meri pyari saheli nibandh hindi

Bidai bhashan in hindi



farewell speech for teacher in hindi
farewell speech in hindi for seniors
farewell speech in hindi for colleague
farewell speech in hindi pdf
vidai speech in hindi
farewell speech in hindi for boss
vidai samaroh quotes in hindi
vidai samaroh bhashan in hindi
vidai samaroh shayari in hindi
farewell poems hindi
funny farewell quotes in hindi
farewell speech in english
beti ki vidai shayari in hindi
vidai shayari student
farewell shayari in hindi language
farewell shayari in urdu
retirement ki kavita in hindi
retirement speech in gujarati
funny college farewell shayari
bidai shayari hindi mai
vidai geet school
shikshak bidai geet
vidyarthiyon ke liye bhashan
farewell speech in odia pdf
vidai geet for teacher in hindi
vidai samaroh in english
school vidai geet hindi
teacher vidai geet lyrics
farewell speech for best friend in hindi
retirement shayari in hindi
hindi poem on vidai samaroh
poem on retirement of teacher in hindi
retirement speech in english
retirement wishes in marathi images
poem for teacher retirement party in hindi
farewell speech for teacher in english
seva nivrutti kavita in hindi
sample retirement speech for mom
valedictory speech in hindi
shikshak bidai kavita
farewell motivational speech in hindi
farewell speech for seniors in odia
college experience speech in hindi

Nirop samarambh speech

nirop samarambh speech
nirop samarambh speech
nirop marathi meaning
nirop marathi meaning



nirop samarambh speech
nirop samarambh in marathi
nirop samarambh information in marathi
nirop samarambh bhashan pdf
10 nirop samarambh bhashan
nirop samarambh marathi speech
nirop samarambh bhashan in marathi pdf free download
nirop detana bhashan
marathi greetings for birthday
naming ceremony quotes
engagement wishes in marathi
namakarana invitation in kannada language
best wishes for exam in marathi
newborn baby announcement message in marathi
wording for naming ceremony invite
lagnachya shubhechha in marathi sms
thank you note in marathi
retirement marathi kavita
barsa invitation message in marathi
nirop samarambh marathi kavita
namkaran vidhi marathi
nirop marathi meaning
marathi nimantran patrika matter
seva nivrutti kavita in hindi
nirop samarambh kavita in marathi
seva nivrutti meaning in english
retirement invitation card in marathi
congrats retirement images
nirop samarambh sutrasanchalan
10th sandop speech in marathi
manogat.com marathi
retirement speech for friend in marathi
nirop samarambh college
nirop samarambh geet
nirop samarambh speech in english
10th class nirop samarambh
nirop samarambh bhashan college

How to retain women in STEM researches



Implicit bias, family pressure and gender stereotype are preventing women from pursuing STEM careers beyond the postdoctoral level

Despite greater opportunities in STEM and a rich history of scientists such as Rukhmabai (India’s first practising doctor), Janaki Ammal (botanist), Ashima Chatterjee (India’s first woman doctorate in Science), Kamala Sohonie (biochemist), Rajeshwari Chatterji (first woman engineer from Karnataka and IISc’s first woman faculty) Shakuntala Devi (mathematical wizard), to mention a few, it has been observed far fewer girls choose to enter the research sector of Science, Technology, Engineering and Math (STEM). More recently, to improve the abysmally less percentage of women in IITs, the ministry of HRD directed 23 IITs to add at least 14% female students in the list in 2018.

“The increase in female enrolments happened not by accident but by design. Our faculty took a proactive approach, mentoring and counselling parents to dispel their pre-conceived doubts,” says V Ramgopal Rao, director, IIT Delhi. The proactive approach helped IIT Delhi, which registered 16% enrolments (143) in the 2018-19 session as opposed to 93 last year.


Timothy A Gonsalves, director, Indian Institute of Technology (IIT) Mandi, heading the JAB subcommittee set up to increase female enrolment in IITs, says, “We had a target of 20% seats for girls within the IITs and the results have been encouraging. At IIT Mandi itself, 18% seats (36) have been filled by girls, of the 200 seats, which shows their numbers is on the rise.”

POSTDOCTORAL POSITION

“Among the PhDs in Science, about 25-30% are women with the actual attrition begins after the PhD. In fact, women heading laboratories, science section in government offices, governing or advisory bodies is not too common,” says Rohini M Godbole, professor at the Centre for High Energy Physics, Indian Institute of Science (IISc).

Godbole feels the steady decrease in the numbers is due to their inability to balance a family and career. The institute now has started a crèche, owing to the high rate of female scientists dropping out because of family responsibility. Godbole observed that while there are no dearth of women teaching Science and Mathematics in schools and colleges, the percentage of women faculty of institutes like TIFR (Tata Institute of Fundamental Research), IITs, or IISc is just 10-12%. “Low percentage of women between the doctoral and professional stages may be attributed to social pressure on women,” she adds.

NEED OF THE HOUR

Stereotype threat (linked to the common perception that girls are not good in Math) and implicit bias are the reasons why women remain under-represented in STEM fields, says VK Garg, president and CEO of MPower Global STEM Education. That besides, deep-rooted gender discrimination is yet another reason women are not seen at senior level and sometimes not considered for promotions, adds Garg.

EFFORTS AND INITIATIVES

Government and the private sector has introduced a number of programmes to help women resume their careers in Science after a break while gender equity in Science and Technology as a policy was introduced a decade back. “While that is necessary, it is far from sufficient. Flexible postdoctoral positions where women can either work from home (if their research permits) or they can return to a postdoctoral position and rebuild their resume to apply for a job in case they take maternity leave can check attrition rates,” says Godbole. Timely intervention, at school level, can help mitigate gender imbalance in STEM, feels Mudrika Khandelwal, professor, IIT Hyderabad, who was closely associated with her institute’s Vignan Jyothi Knowledge Centre to look into coaching, mentorship with role models to stimulate equality in girls’ participation in STEM careers.

“This year, a two-week residential pilot programme was organised for 30 meritorious class XI girls (from government schools of Kandi and Sangareddy) to expose them to personality development, etc,” says Khandelwal.

Parsi hosp row reaches charity chief


Plea Says Panel Plans To ‘Transfer Part’ Of Facility To Medanta


Mumbai:

The 106-year-old Parsi General Hospital’s plan to allow Medanta Group of Hospitals to use a portion of its 10-acre Breach Candy property worth an estimated Rs2,000 crore is snowballing into a controversy within the Parsi community. TOI has learnt that Medanta will be allowed to operate a new hospital within the premises for up to 45 years without obtaining the charity commissioner’s approval.


The hospital management agreement, a copy of which is in TOI’s possession, states Medanta will initially pay a security deposit of Rs2 crore and cash deposit of Rs4 crore to Parsi General. The hospital, for exclusive use of Parsis since 1913, has been incurring a loss of Rs6 crore a year and currently has an occupancy rate of less than 30%.

The new seven-storey building will be constructed by Parsi General Hospital after a Parsi philanthropist couple in Hong Kong, the Shroffs, announced a donation of over Rs150 crore last year. The new hospital will be equipped and managed by Medanta for 30 years with a renewal option for another 15 years. “An exclusive right to run the hospital for profit for 45 years amounts to transfer of interest within the ambit of Section 36 of Bombay Public Trust Act,” said a legal expert who reviewed the agreement.

But the hospital management claimed the multi-specialty hospital to be run by Medanta will cross-subsidise the existing loss-making hospital.

The agreement reveals another anomaly, which community activists say raises eyebrows. The Bombay Parsi Punchayat (BPP), owner of the Parsi General complex, is not a party to the agreement. In fact, the hospital’s managing committee had refused to furnish a copy of the proposed agreement to BPP until an exchange of emails compelled it to part with it. Advocate Khushru Zaiwala, who has moved the charity commissioner seeking dismissal of the managing committee, said in his application, “The managing committee of the Hospital Trust, constituted only for the internal management of the same, are presently collaborating and colluding with each other, to transfer a substantial area of the hospital, worth over Rs2,000 crore, to Medanta Corporation under the guise of a Management Contract.” The application also sought injunction against the hospital management from transferring the property to a third party without calling for “best offers” through ads/public auction followed by permission of charity commissioner.

Responding to a questionnaire sent by TOI, the hospital’s managing committee president Homa Petit issued a statement saying: “It would be improper for the committee to answer your queries since the same form the subject matter of an application filed by one Mr. Zaiwala, before the office of the Charity Commissioner. Suffice it to say that it is most unfortunate and truly regrettable that the ill-advised actions of a few are seeking to prevent the benefits that would otherwise flow to the entire Zoroastrian community.”

A legal expert said though both BPP and the hospital are public charitable trusts governed by Bombay Public Trust Act, neither were offers invited nor the charity commissioner’s nod obtained before entering into the agreement. “This is mandatory under Section 36 of the Act,” he said. “The trust deed states land and buildings can be used only for a hospital for only Parsis. This raises the issue if a cosmopolitan new hospital can be housed in the complex.”

Chhatrapati Shahu Maharaj Bhashan




chhatrapati shahu maharaj bhashan shahu maharaj speech in english shahu maharaj history shahu maharaj kavita marathi kavita on shahu maharaj rajashri shahu maharaj speech chhatrapati rajarshi shahu maharaj bhashan short speech on shahu maharaj in english shahu maharaj kolhapur family tree shahu maharaj photo shahu maharaj family tree rajaram ii of satara shahu maharaj kolhapur shahu maharaj palace kolhapur shahu maharaj history in hindi shahu maharaj hd images shahu maharaj short speech in marathi books on shahu maharaj deccan rayat samaj shahu maharaj quote picture of shahu maharaj shahu maharaj jayanti images shahu maharaj quotes shahu maharaj dialogue maharshi vitthal ramji shinde information

Rooms for stay of family of patients undergoing treatment in Mumbai

*Radhakishan Damani*, the promoter of *DMart*, has created a facility at *Gopal Mansion* near *Metro Cinema Queens Road Mumbai* containing 53 rooms for stay of family of patients undergoing treatment in Mumbai. It was inaugurated yesterday. It's very nicely done.  May refer for any such genuine need for well wishers.

Address:
Gopal Mansion
50, Queen Road (Cinema Lane)
Near Metro Cinema
Mumbai 400 020

Contact Details:
Whattsup App. Mobile
91 88799 86893
e.mail:
f...@gopalmansion.com
g...@gopalmansion.com
Tel No: 022 22055001/02

www.gopalmansion.com

Rates are
Very Reasonable
Breakfast 30
Lunch Thaali 75
Dinner Thaali  75
Rooms at   800
Kitchen and Dining Very Spacious.

Please share widely.
Hi All..
If you have relatives in Mumbai then pl. share this information to all. *We provide TIFFIN to  patients & relatives without any charges.* Area - South Mumbai
Hospitals:- Jaslok, Saifee, Bombay, Nair, J.J, all near to Mumbai Central and VT....
Contact details:-
U can also WhatsApp us
*Kalpesh Lodha 9967236006*
*Manoj Patwari 9820645070*
*Amrat Jain 9029373751*
At least forward to people who might be able to help by forwarding to others.

*R.K. Charitable Trust* have started Home Medical Equipment like
* *Wheelchair*
* *Suction Machine*
* *Waterbed*
* *Airbed*
* *Walker*
Free of cost for use (with Refundable Deposit)
Contact person:-
*Sanjay Shah 9322516628*
*Chintan Pandya :- 7666311942*
*Add:-17-D, Nisarga Apt. Near IDBI bank, Mahavir Nagar, Kandivali West Mumbai 67*
Please post this message in the known groups so that it gets circulated.

*SAI VILAYATRAI CHARITABLE POLYCLINIC*
"Kambar Darbar" Shantilal Modi Road, Opp Bhurabbhai Hall, Kandivali(W), Mumbai.
*T: 02265811644*
*0222865 9615*
*www.kambardarbar.org*

*DAY TIME CHGES*

1. *General OPD* ₹1/- only with medicines
Daily _11-30 am & 4-30 pm_

2. *X-Ray*  ₹100/-
Daily _9 am to 5-00 pm_ 

3. *ECG* ₹70.00
Daily _*9.00 am to11.00 am*_

4. *Pathology*  Highly subsidised rates. CBC ₹20/- only.
Daily _8.30 am to 12.00 noon_

5. *Eye Checkup* ₹20/-
Daily _3.30 pm_
Morn _9am: Wed, Fri, Sat._
Cataract Surgery: FREE with best Indian lens.
Lazer (Phaco) surgery:
₹5,300/- US imported non-foldable lens
₹10,000/- UK imported foldable aspheric lens.(Outside rateRs 40,000/-)

6. *Gynecology/ IVF/ Hysteroscopy* 
_Tue/Thur/Fri. 1 pm._

7. *Skin Spl.*  ₹20.00
Mon _3.30 pm_

8. *Orthopedic* ₹20.00
Tue _3.30 pm_

9. *Diabetic & Cardio*  ₹20.00
Wed _4.30 pm_

10. *Child Spl.*  ₹20.00
Fri  _5.30 pm_   

11. *Ear / Nose / Throat*  ₹20.00
Wed / Friday _3.30 pm_

12. *Dental* Nominal Charges R C charges: ₹750/-.
Daily _9.00 am to 1.00 pm_
Daily _2.00 pm to 5.00 pm_

13. *Dialysis* Free for BPL patients 
Daily ( Phone: 28067645 )

14. *Cervical cancer* (Uterus Cancer) Test Free

15. *Anti Cancer Injection* for Girls  aged 14 yrs to 24 yrs.

16. *Hearing Aids* for Sr. Citizens @ 50% of the actual cost. Free for deserving children by Birth.

17. *Notebooks and other staionery items* to all students on discounted rates during summer vacation.

18. *Scholarship* for Higher Education for deserving candidates for *BE MBBS CA CS BPHARM MCA & selected  MBA students.*

*Visit*
www.kambarda bar.org & submit Form with all required enclosures.

Kindly contact on email p_zijn zasa...@rediffmail.com

*NO NEED OF ANY  RECOMMENDATIONS.*

*KINDLY SHARE*