कावळ्याच्या गोष्टीचं रामायण!

एकदा एका कावळ्याला खूप तहान लागली. गावात कुठेही औषधालादेखील पाणी नव्हतं. कावळा कासावीस झाला होता. तेवढय़ात त्याला एक मोठी घागर दिसली. तो घागरीत डोकावला. घागरीच्या तळाशी थोडंसं पाणी होतं. कावळ्याने आजूबाजूचे दगड चोचीने त्या घागरीत घातले. दगड घातल्यावर पाणी वर आलं आणि कावळा ते पाणी पिऊन आनंदाने उडून गेला. अस्सा हा हुश्शार कावळा! चौथीतल्या काही चौकस मुलांना मी ही गोष्ट सांगितली. त्या पुढे जे रामायण घडलं, ते आम्हा साऱ्यांच्याच बुद्धीला विलक्षण चालना देणारं होतं.
कावळ्याची गोष्ट सांगून होताक्षणीच मुलांची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. गावात पाणी का नव्हतं? गावात पाणी अजिबात नव्हतं तर ते त्या घागरीत कुठून आलं? गावात पाणी नसताना कुठल्या वेडय़ा माणसाने आपल्या घागरीत असलेलं थोडंसं पाणी असं उघडय़ावर ठेवलं? कावळ्याने किती दगड पाण्यात घातले? कावळ्याला छोटे-छोटे आणि खूप दगड पाण्यात घालावे लागले असणार; मग तो दमला नाही का? घागर मातीची होती की, स्टीलची? मातीची असेल तर कावळ्याने दगड टाकताना ती फुटली नाही का? घागरीच्या तळाशी असलेलं पाणी दगड टाकून वर येत असेल तर नदी किंवा तलावांच्या तळाशी गेलेलं पाणीही मोठ्ठे दगड टाकून वर आणता येणार नाही का? तसं करता आलं तर आपल्याला कधीच पाणी कमी पडणार नाही. समुद्रात खूप मोठे दगड घालतात, मग समुद्र, पण असाच वर का येत नाही? किंवा तसा तो वर आला तर काय होईल?
एक ना दोन हजार प्रश्न! भल्याभल्यांनाही विचारात पडणारे! गावात पाऊस कमी झाला, आणि गावकऱ्यांनी नीट सांभाळून पाणी वापरलं नाही, त्यामुळे गावातलं पाणी संपलं असणार असाही एक विचार मुलांनीच मांडला. आम्ही सारे मिळून चर्चा करता करता कावळ्याच्या गोष्टीतून थेट जागतिक पातळीवरच्या पाण्याच्या प्रश्नापर्यंत पोहोचलो होतो. शेवटी कावळ्याची गोष्ट प्रयोग करून पडताळून पाहायची ठरली. प्रयोग करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार झाली. एकाने त्याच्या घरातले छोटे दगड आणायचं ठरवलं. दुसऱ्याने त्याच्या घरात नुकतेच आणलेले कुल्फी खाऊन रिकामी झालेली मातीचे छोटी मडकी आणायचं कबूल केलं. माझ्याकडे स्टीलची मोठी घागरही होती. तीही प्रयोगाच्या सामानात येऊन दाखल झाली आणि प्रयोगाचा दिवस ठरला.
प्रयोग करण्यासाठी सारे कावळे जमले. कावळ्याचा ‘रोल’ तर मुलेच करणार होती. सर्वात आधी गोष्टीबरहुकूम मोठय़ा घागरीच्या तळाशी थोडंसं पाणी घातलं. मुलं सरसावली. पाण्यात एक एक दगड घालायला लागली. पाणी वर यायचं सोडाच, दगडच भरायला लागले आणि जेमतेम पाव घागर भरेपर्यंत मुलांनी आणलेला दगडांचा साठा संपला. असं नको.. आपण प्रयोगासाठी छोटीच घागर घेऊया, मुलांनी एकच सूर लावला. कुल्फीच्या मातीच्या छोटय़ा मडक्यात तळाला घोटभर पाणी घालून परत प्रयोग सुरू झाला.
पाण्यात पहिला दगड घातला, पाणी थोडंसं वर आलेलं दिसलं. मुलांनी उत्साहाने पुढचे दगड घातले. हळूहळू पाणी खालीच राहून दगडच वर यायला लागले. पाणी दगडांच्या खाली, दगडांच्या फटींमध्येच राहिलं. पाणी कावळ्याच्या चोचीला लागेल एवढं काही वर येईना. मग आपण मुळातच घागरीत खूप कमी पाणी घातलं होतं, तेव्हा आता जरा जास्त पाणी घालून प्रयोग करून पाहूया असं ठरलं. दुसऱ्या मडक्यात जरा जास्त पाणी घालून परत तोच प्रयोग केलं. पण आपलं जैसे थे! पाणी सुरुवातीला वर यायचं, पण दगडांची संख्या वाढली की, दगडच वर येत होते आणि पाणी आपलं खालीच राहात होतं. होता होता मडक्यात आधी खूपच पाणी असेल तर काही दगड घातल्यावर ते पाणी वरती म्हणजे अगदी मडक्याच्या काठापर्यंत येईल आणि तेव्हाच ते कावळ्याला पिता येईल, असा निष्कर्ष मुलांनी काढला. त्यातच एका ‘वात्रट’ मुलाने, मडक्यात एवढं पाणी असताना खरंतर कावळ्याने त्यात दगड टाकायचीही काही गरज नव्हती, असाही शेरा मारला. तर जात्याच हुशार असणाऱ्या एकाने साधारण पाऊस पडला तर तो असाच जमिनीखालच्या भल्या मोठय़ा दगडाखाली जात असणार म्हणून खूप पाऊस पडला, तरच विहिरींमधलं पाणी आपल्याला मिळण्यापुरतं वर येत असणार, असा तर्क मांडला.
पंचतंत्रातल्या एका साध्या गोष्टीचा परामर्श घेत मुलं थेट जमिनीखालचे पाण्याचे स्रोत आणि त्यांचा पावसाच्या पाण्याशी असलेला संबंध यावर विचार करायला लागली होती. सुरुवातीला दगड टाकला की, पाण्याची पातळी वाढते, हा अनुभव त्यांना नकळतपणे आíकमिडीजचं तत्त्व शिकवून गेला होता. दगडांचं आकारमान पाण्यापेक्षाही जास्त झालं की, ते पाण्याच्या बाहेर येतात; पाणी द्रवरूप आणि वाहत असल्यामुळे ते दगडांच्या फटीत शिरतं, अशीही काही महत्त्वाची निरीक्षणं मुलांनी नोंदली होती. 
तर कावळ्याच्या गोष्टीच्या निमित्ताने काय काय घडलं?
*    मुलांनी गोष्ट नीट लक्ष देऊन ऐकली.
*    त्यामुळे त्यांच्या मनात अनेक शंका किंवा प्रश्न निर्माण झाले आणि त्यांनी ते मोकळेपणाने मांडले.
*    शंकानिरसनासाठी मुलांनी प्रयोग करून गोष्टीचा पडताळा करायचा ठरवला.
*    प्रयोग करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी मुलांनीच तयार केली आणि त्या वस्तू आपल्याच आसपास शोधल्या आणि प्रयोगशाळा नसली तरी प्रयोग करून पाहता येतो, हे मुलांनं समजलं.
*    पहिला प्रयोग अयशस्वी झाला, तर परिस्थिती बदलून तो वारंवार करून पाहावा, याचं आकलन त्यांना झालं.
*    कावळ्याने दगड टाकल्यावर पाणी वर आलं, ही घटना वाटते तशी सोपी नाही; हे त्यांना कळलं.
*    अनेक प्रयोगांच्या शेवटी मुलांनी स्वत:चे निष्कर्ष काढले आणि ते मूळ संकल्पनेपेक्षा खूपच वेगळे होते.
*    मुलांना नकळतपणे विज्ञानातल्या काही नियमांची ओळख झाली.
*    ऐकीव गोष्ट बिनदिक्कतपणे खरी समजायची नाही, तर त्यावर सारासार विचार करायचा, हे मुलांच्या लक्षात आलं.
थोडक्यात काय तर मुलांनी स्वत:च एक प्रयोग रचला, मांडला, केला आणि त्या अनुभवातून बऱ्याच काही महत्त्वाच्या इतर विचारांना चालना मिळाली. कावळ्याच्या गोष्टीतून रामायण घडलं ते असं! तेव्हा मुलांनो, पंचतंत्राचं पुस्तक उघडा, एखादी गोष्ट वाचा, त्यावर प्रयोग करता येतो का ते पाहा आणि स्वत:च शिकून शहाणे व्हा!

No comments:

Post a Comment